किनवट : किनवट-माहुर तालुक्यातील वाहनांची संख्या लक्षात घेऊन किनवट येथे स्वतंत्र कायमस्वरूपी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यात यावे, या मागणीचे निवेदन युवानेते संजय सिडाम, गौतम वाघमारे यांच्या शिष्टमंडळाने आ. भीमराव केराम यांना दिले.
निवेदनात असे नमूद केले की, जिह्वापासून १५० कि.मी. अंतरावर असलेले किनवट / माहूर हे तालुके अतिशय दुर्गम व मागास तालुके आहेत. नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय जिल्ह्यातील ईतर तालुक्यात महिन्यातून दोनदा तर किनवट तालुक्यासाठी महिन्यातून केवळ एक दिवसच कॅम्प आयोजित करून वाहनाचे विविध प्रकारचे परवाने देते. या ठिकणी दुचाकी, चार चाकी व इतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु किनवट/माहुर अशा दोन मोठ्या तालुक्यासाठी प्रत्येक महिन्याच्या २८ तारखेला प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कॅम्प आयोजित केले जाते. परंतु एका दिवसात शेकडो वाहनांचे वाहन चालक परवाने, वाहन नोंदणी, फिटनेस प्रमाणपत्र देण्यास या एका दिवसाच्या कॅम्पमध्ये ताण पडत असून केवळ ५ तासात यवढे परवाने किंवा प्रमाणपत्र देणे शक्य होत नाही. परिणामी शेकडो वाहनधारकांची कामे प्रलंबित राहतात. एका परवान्यासाठी वाहनधारकांना तीन-तीन महिने प्रतिक्षा करावी लागते. सदर वाहन कॅम्पच्या व्यतिरिक्त दिवशी नांदेडच्या कार्यालयात वाहन घेऊन जावे लागते. त्यामुळे नाहक आर्थिक भुर्दंड व वेळ वाया घालवावा लागतो. सदर कामी अधिकारी किंवा कनेक्टिव्हिटी नसेल तर पुन्हा खेटे मारावे लागते.
या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आपण स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किनवट येथे सुरु करावे. आ. केराम यांनी शिष्टमंडळास सदर मागणी रास्त असल्याचे सांगून परिवहन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगितले. निवेदनावर अ. भा. आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय सिडाम, मनसे वाहतूक सेनेचे गौतम वाघमारे, राहुल महाबळे, जितेंद्र कुलसंगे, अजय सिडाम, संतोष पहुरकर, संघपाल कावळे, हरिदास डहाळे, विकास वाघमारे, प्रमोद कोसरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment