मुंबई : राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांची अहवेलना होत असतानाच नियमबाह्य व अयोग्य शिक्षकांना पुरस्कार दिला जात असल्याचे समोर येत आहे. कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रातील पुरस्कारावर गदा आली होती. याच काळात रणजित डिसले सरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला व शिक्षण क्षेत्रात चैतन्य निर्माण झाले.योग्य व्यक्तीस पुरस्कार प्राप्त झाला तर त्या पुरस्कारांचाही व्यक्तीसह सन्मान होतो. नाहीतर पुरस्कार कसे मिळतात? हे जगजाहीरच आहे. माजी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सर्व प्रथम पुरस्कार अर्ज मागवण्याची प्रथा सुरू केली व त्यात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर माजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या काळात कोरोनामुळे राज्य शिक्षक पुरस्कार देण्यात आले नाहीत.
शिक्षण क्षेत्रात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी यापूर्वी आँनलाईन अर्ज मागविण्यात आले होते व आताही राष्ट्रीय पुरस्कार अर्ज आँनलाईन मागवण्यात आले आहेत. पुरस्कार प्राप्त करण्यासाठी शाळेतील इयत्ता नववी व दहावीचा निकाल शंभर टक्के असावा लागतो. शाळेतील मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी सदर शिक्षकाचा अहवाल पाठवणे अपेक्षित असते. परंतु या नियमाची अंमलबजावणी न करता मुंबई उपनगरातील एका शाळेच्या शिक्षकास हा पुरस्कार देण्यात आला होता.शाळा प्रशासनाने या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती शिक्षण विभागाकडे न देता पुरस्कार देण्याचे गुपित काय आहे? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी काही शिक्षकांनी सध्या अर्ज केलेले आहेत. या शिक्षकांचा अहवाल शिक्षण विभागाच्यावतीने तपासण्यात येत आहे. यावर्षी या नियमांची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे व नियमबाह्य देण्यात आलेल्या पुरस्कारांची चौकशी केली पाहिजे अशी अपेक्षा शिक्षक वर्गाकडून करण्यात येत आहे. माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आलेल्या पुरस्कारची माहिती लवकरच घेण्यात येणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करून सन्मानित शिक्षकांचा अपमानास्पद वागणुकीबद्दल आवाज उठवला आहे. भारतीय जनता पक्षाचे शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे यांनी अन्याय ग्रस्त शिक्षकासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली व त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले आहेत यापुढे योग्य योगदान असलेल्या व्यक्तीस पुरस्कार मिळेल केवळ कागदी घोडे नाचणार्या व्यक्तींवर चाप बसला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करून मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशिल शिक्षकांना दैनंदिन चाकोरीबद्ध कामात अडकवून ठेवू नये. त्यांच्या ज्ञानाचा आणि उपक्रमशिलतेचा योग्य वापर करण्यासाठी अशा शिक्षकांना स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे असे मत शिक्षक भारतीचे शिक्षक नेते सुभाष मोरे यांनी व्यक्त केले आहे.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे व त्यांच्या वेतनश्रेणीत वाढ झाली पाहिजे असे मत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शिक्षक उदय नरे यांनी व्यक्त केले आहे.या संदर्भात लवकरच शिक्षक प्रतिनिधी संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहेत अशी माहिती प्राप्त झाली.
No comments:
Post a Comment