किनवट : आदिलाबाद - नांदेड - आदिलाबाद ही कृष्णा इंटरसिटी एक्स्प्रेस रेल्वेगाडी गेल्या ९ महिन्यांपासून बंद असल्याने, किनवटसह अनेक तालुक्यातील प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे. त्यामुळे सदर रेल्वेगाडी त्वरित पूर्ववत सुरू करा, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उद्धव रामतिर्थकर यांनी नुकतीच केली आहे
यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक यांच्यासह रेल्वे मंत्रालयाकडे पाठविलेल्या निवेदनात उद्धव रामतिर्थकर यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या एप्रिल महिन्यापासून आदिलाबाद- नांदेड - आदिलाबाद इंटरसिटी एक्सप्रेस ही नियमित रेल्वेगाडी बंद करण्यात आली.
तिरुपती -आदीलाबाद कृष्णा एक्सप्रेस ही गाडी पहाटे आदिलाबादला आल्यानंतर, आदिलाबाद-नांदेड -आदिलाबाद ‘इंटरसिटी एक्स्प्रेस’ या नावाने धावत होती. कोरोनाची तीव्रता देशभरात कमी होत असताना, रेल्वे मंत्रालयाने विविध मार्गांवर शेकडो रेल्वेगाड्या पुन्हा सुरू केल्या आहेत. परंतु, दुर्गम व आदिवासीबहुल किनवट - माहूर तालुक्यातील प्रवाशांसाठी सध्या आदिलाबाद-मुंबई या विशेष रेल्वेगाडीशिवाय इतर कोणतीच गाडी नाही. यामुळे केवळ किनवट,माहूरच नाही, तर हिमायतनगर, हदगावरोड, भोकर, मुदखेड तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
९ महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे किनवट रेल्वेला कोट्यवधींचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदिलाबाद - नांदेड -आदिलाबाद ही इंटरसिटी एक्सप्रेस विनाविलंब सुरु करावी, अशी मागणी उद्धव रामतीर्थकर यांनी केली आहे.




No comments:
Post a Comment