लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कार्य आणि रशिया प्रवास
-नवनाथ रणखांबे, गौरगांव, तासगांव (सांगली)
१ ऑगस्ट १९२० रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला १ ऑगस्ट २०२० रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्म शताब्दी आरंभ होत आहे. यानिमित्त त्यांनी लिहिलेल्या प्रवास वर्णन "माझा रशियाचा प्रवास " या पुस्तकावर आणि त्यांच्या महान कार्यावर नवनाथ रणखांबे यांनी थोडक्यात टाकलेला प्रकाश - संपादक
अण्णाभाऊ साठे यांचे वडील भाऊ साठे यांनी आपली पत्नी वालुबाई , मुलगी जाई , मुले शंकर आणि तुकाराम उर्फ अण्णा हा त्यांचा परिवार घेऊन मुंबईला जाण्याचा बेत केला. त्यांच्या कुटूंबाकडे मुंबईला जाण्यासाठी गाडी खर्च नसल्यामुळे ते सर्व वाटेगाव ( वाळवा/सांगली) ते मुंबई हा प्रवास पायी केला . हा प्रवास करत असताना चालून चालून अण्णांचे पाय सुजले होते. वाटेत मिळेल तो काम धंदा करून जागो जागी मुक्काम करत हे कुटूंब प्रवास करीत होते. या परिवाराचा हा प्रवास दुखमय , खडतर आणि संघर्षमय झाला. दोनशे सत्तावीस मैलांचे अंतर कापायला त्यांना दोन महिने लागले होते. पुढे या परिवाराला पुण्यानंतरचा प्रवास डोंगराळ आणि दाट झाडीतून करायचा असल्यामुळे तो करणे अवघड झाले. यावेळी रेल्वे गाडीत कोळसा भरणे आणि उतरवणे हे काम त्यांना एका ठेकेदाराकडून मिळाले. एके दिवशी ठेकेदाराला न सांगताच एका रेल्वेत हा परिवार बसला आणि 'कल्याण' ला आला. पुढे कल्याण, भायखळा, चेंबूर, पारसी ऑट्रॉय पोस्ट, आणि माटुंगा येथे त्यांचे वास्तव्य झाले .
"समानता ", हे "मूळ" रशियन क्रांतीचे होते. लेनिनच्या नेतृत्वाखाली कामगारांनी रशियन क्रांती घडवून आणली. त्यामुळे जगभरातील कामगार या क्रांतीकडे वेगळ्या आशेने पाहू लागले. लेनिनने जणू आंतरराष्ट्रीय क्रांतीसाठी कामगारांना प्रोत्साहित केले होते. सर्व देशात कम्युनिस्ट विचारांच्या शाखा स्थापन झाल्या. रशियन क्रांतीत सहभागी असणारे रॉय यांनी भारतातील कांही लोकांना कालमार्क्सचे ग्रंथ पाठवले होते. भारतातील मजूरही या क्रांतीकडे आशेने पाहत होते.
मुंबईत आल्यावर अण्णा भाऊ साठे यांच्या वैचारिक जडण घडणीत आणि बौद्धिक पातळीत बदल झाला. सहवासामुळे माणूस घडला जातो असे म्हणतात, तसेच अण्णा भाऊ साठे घडत गेले. मुंबईत आल्यावर साठे कुटूंब मिळेल तो कामधंदा करू लागले. मुंबईत कामगार संप, बंद, मोर्चे इ .मोठया प्रमाणत करू लागले. न्याय मिळवण्यासाठी आणि आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी ते असे करीत होते. कामगार चळवळीचे वारे त्या काळी जोरात वाहू लागले होते. विविध कामांवर , कामगार संघटना कामगरांच्या न्याय आणि हक्कासाठी भांडवलदारांशी झगडत असत. या कामगार आणि भांडवलदार यांच्या संघर्षाचा चांगल्या आणि वाईट बाबींचा अण्णावर परिणाम झाला. अण्णा भाऊ साठे कम्युनिस्ट विचार सरणीकडे खेचले गेले. कालमार्क्सच्या विचाराने आकर्षित झाले. १९३४ च्या सुमारास अनेक जप्त झालेली पुस्तके त्यांनी वाचून काढली. रशियन क्रांती वाचून ते भारावून गेले आणि रशियन क्रांती वर प्रभावित झाले. कॉ. लेनिनच्या कार्याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यक्रमासाठी आणि पार्टीच्या सभेत कवने, पोवाडे, आणि गाणी गायला त्यांनी सुरुवात केली. आण्णा भाऊ साठे यांचा शाहीर म्हणून उदय होऊन ते लोकप्रिय झाले. कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करण्यासाठी १९४४ मध्ये 'लाल बावटा कला पथक' हे अण्णा भाऊ साठे , अमर शेख, द.ना.गव्हाणकर यांनी स्थापन केले. यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी पोवाडे, गीते इ. लिखाण करून गाण्यास सुरुवात केली. अण्णा भाऊ साठे यांनी या कालखंडात १५ लोकनाट्य लिहिली. त्यांच्या वगनाट्यांनी ज्वलंत सर्वसामान्य प्रश्न, माणसाचं शोषण, संप, मोर्चे, काळा बाजार, युद्ध , निवडणुका, दुष्काळ, राजकीय इ. विषयांवर महाराष्ट्रात जनजागृती केली. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, बेळगाव कारवार सीमा वाद, गोवा मुक्ती आंदोलन या राजकीय घडामोडीं बद्दल सामान्य जनां साठी त्यांनी मोठी जनजागृती आणि समाजप्रबोधन केले. असे अनेक चर्चात्मक विषय त्यांनी घेतले. पोवाडे, लावणी, पदे ,गीते , गण, छक्कड इ. लिहिले. सामान्य लोकांच्या चालू घडामोडींवर व ज्वलंत समस्यांवर लोकनाट्ये लिहिली. तमाशाला एक समकालीन चर्चेचे विचारपीठ बनवले. त्यांनी सर्व सामान्य माणसांच्या जीवनाचे वास्तवतेचे साहित्य लिहून बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला
अण्णा भाऊ साठे यांची बरीच पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यांचे लिखाण मला आवडले आणि मी त्यांना वाचत गेलो. त्यांच्या 'फकिरा' कादंबरीने तर मी ढसा ढसा रडलो. फकिरा फेम अण्णा भाऊ साठे हृदयावर कोरले गेले. अण्णा भाऊ साठे यांची 'जाल ' ही हिंदी मध्ये भगवान ठाकूर यांनी अनुवादित केलेली कथा मनाला भावते. निडर, रोख ठोक, प्रबोधनवादी आणि दूरदृष्टी असणाऱ्या हरिबाचे नेतृत्व मनाला भावते. ( संदर्भ ग्रंथ भारतीय दलित साहित्य कथा - कोश (मराठी) संपादन रमणिका गुफ्ता, पान नंबर २१ ते २९)
अण्णा भाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि इतर लिखाणातील पात्रे ही वास्तवात त्यांच्या आवती भोवतीची होती. ते कल्पनेतल्या पात्रात वावरणारे साहित्यिक नव्हते. त्यांच्या लेखणीला झणझणीत वास्तवतेची झालर होती हे त्यांचे साहित्य वाचतांना मला दिसून येते. त्यांचे साहित्य समाज प्रबोधन करणारे आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आहे. 'स्मशानातील सोनं' यातील भीमाची कथा अंगावर काटा मारते तर टिळा लाविते मी रक्ताचा, आवडी, अलगुज, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, वैजयंता, फकिरा, माकडीचा मळा, आग, स्वप्नसुंदरी, रूपा, वारणेच्या खोऱ्यात, चित्रा इ .पुस्तके वाचली आणि कथा ऐकल्या की त्यातील पात्रे वास्तवातील आपल्यामधील सर्व सामान्य माणसं केंद्र बिंदू असणारी जाणवतात. त्यांची प्रसंग डोळ्यापुढे उभा करणारी लेखनशैली जबरदस्त आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी तीस कादंबऱ्या आणि बावीस कथा संग्रह लिहिली, त्याच्या अनेक आवृत्ती भारतातील १४ भाषां बरोबर फ़्रेंच, रशिया, जर्मन, झेक, पोलीश इ. या प्रमुख विदेशी भाषेत अनुवादित झाले. यातून त्यांच्या दर्जेदार लेखणीचा प्रत्यय येतो. १९६१ रोजी 'फकिरा' या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार मिळाला. अण्णा भाऊ साठे यांचे मामा फकिरा हे कादंबरीच्या आणि चित्रपटाच्या रूपाने जगासमोर आले. त्यांच्या काही कादंबऱ्यांवर मराठी चित्रपट निघाले ते म्हणजे, अशी ही साताऱ्याची तऱ्हा , मुरळी मल्हारी रायाची, वारणेचा वाघ, बारा गावचं पाणी , फकिरा, डोंगरची मैना चित्रपट होय. यावरून त्यांच्या लेखनाचे महत्त्व दिसून येते.
रशियात अण्णांचे साहित्य अगोदर पोहचले होते .
दुसऱ्या महायुद्धातील 'स्टालिनग्राची लढाई' पोवाड्यातून आण्णांनी मांडली होती. या पोवाड्याच्या माध्यमातून त्यांनी 'बर्लिन' पर्यंत गरुड झेप घेतली होती, तर 'चित्रा' ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती.
इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीने रशियास अण्णा भाऊ साठे यांनी जावे असे पत्र अण्णा भाऊ साठे यांना दिले. इंडो सोव्हिएट कल्चर सोसायटीच्या शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे यांचा समावेश झाला. रशियाला जाण्यासाठी अण्णा भाऊ साठे पहिल्यापासून उत्सुक होते. त्यांना ही एक रशियाला जाण्याची संधी मिळाली. रशियाला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे न्हवते, ही बातमी महाराष्ट्रात पसरताच त्यांच्यावर पैशांचा पाऊस पडला. यातून त्यांची लोकप्रियता दिसून येते. अण्णा रशियाला जाणार तो दिवस उजाडला. अनेक जिवाभावाची लोकं त्यांना भेटण्यास आली. लोकांच्या सूचना, हार फुले, आशीर्वाद, उपदेश, सदिच्छा आणि प्रवासाच्या आनंददायी मंगल कामना घेऊन अण्णा भाऊ साठे १२ सप्टेंबर १९६० रोजी रशियाला जाण्याच्या आनंदात होते. मुंबई ते दिल्ली प्रवास त्यांनी विमानाने केला आणि पुढे दिल्ली (पालम विमानतळ) ते उझबेकिस्तान प्रवास 'चितोडची रानी' विमानाने केला. हा प्रसंग त्यांनी रंगवला आहे. विमानात बसल्यावर आणि विमान आकाशात भरारी घेतानाचे वर्णन छान केले आहे. डोंगर टेकडी सारखे दिसणे, नद्यांना ओघळीचे स्वरूप येणे, इमारती काड्यांच्या पेटी एवढ्या दिसत होत्या तर विमान विमानतळावर उतरल्यावर विमानाने पाय टेकले, हिमालयाचे मस्तक , हिमाचा वर्षाव इ. अशा प्रकारचे वर्णन छान केले आहे. पुढे अण्णांचा सोव्हिएटच्या विमानाने पुढचा प्रवास सुरु झाला. यावेळी ढगांच्या राशीतून मार्ग, अनंत दिव्यांचा पुंजका म्हणजे शहर, ढगांचा पडदा , इ. शब्द प्रयोग प्रवास वर्णनात केले आहे. शेवटी 'मास्को' विमानतळावर विमान उतरले. त्यावेळी तेथे थंडी होती. थंडीचे वर्णन करताना वारे धावणे, आंगाला चावत होते असे छान प्रकारे केले आहे. थंडीवरून 'कझकीना' आणि अण्णा भाऊ साठे यांचा संवाद हस्यकल्लोळ करून जातो. विमानतळावरुन ते मोटारीने शहराकडे जातात. चावरा वारा , डोळ्यातून पाण्याच्या धारा हा शब्द प्रयोग संवादाला उंच पातळीवर घेऊन जातात. सोव्हिएट स्काय आलिशान हॉटेल मध्ये या शिष्टमंडळाची राहण्याची सोय केली गेली. अण्णा भाऊ साठे यांना तेथे दुभाष्यक म्हणून 'बारनिकोव' एक महिना काम करणार होते. अण्णांना रशियात सर्वप्रथम रशियातील माणसं बघायची होती. दोन दिवसात त्यांना बरेच रशियन शब्द माहीत झाले. शिष्टमंडळातील डॉक्टर, वकील, आमदार, लेखक इ. वेगवेळ्या लोकांना त्यांच्या क्षेत्रातील रशियाची प्रगती आणि ठिकाणे पहायची होती. अण्णा भाऊ साठे यांना तर तेथिल फुटपाथनं भटकायचं होतं. ज्याला जे आवडेल ते त्यांनी पहावं असे शिष्टमंडळाने ठरवल्यामुळे प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे भटकायला आणि फिरायला मिळणार होते म्हणून प्रत्येक जण आनंदी होता. दुसऱ्या दिवशीच्या दूत निवासाच्या निमंत्रणात जात असतांना अण्णा भाऊ यांना रस्त्याचे काम चालू असल्याचे दिसले. देखरेख करणारी सुटबुट घातलेली पाच माणसं एका मोटारी कडून काम करून घेताना पाहिले. माती उकरणे आणि भरणे , डांबर टाकणे हे सर्व काम मोटार करत होती हे निरीक्षण अण्णांनी टिपले. दूत निवासस्थानात पाहुणचार झाल्यावर शिष्टमंडळ लेनिनग्रँडकडे आले.
पुढे 'आजारबैजाचा' प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे रेल्वे प्रवास वर्णन अण्णांनी छान केले आहे. तेथिल रेल्वे प्रवास त्यांना मुंबईतील बोरी बंदर रेल्वे स्टेशनची आठवण करून गेले. ती रेल्वेतील तुफान गर्दी , धावपळ, मारामाऱ्या, गाडीतला होणारा जय घोष, इ. घटनेचा त्यांच्या पुढे प्रसंग तरळत होता. भारतातील धावपळीचा रेल्वे प्रवास व वातावरण आणि रशियातील शांत प्रवास आणि स्वच्छ स्टेशन यांची तुलना त्यांना जाणवत होती. लेनिनग्रँडमध्ये या शिष्टमंडळाचे स्वागत जोरदार झाले. तेथे प्रोफेसर ततियानाबाई आणि मराठी विध्यार्थी यांनी अण्णांची भेट घेतली. तेथील विश्व विद्यालयाला त्यांनी भेट दिली. तसेच रशियातील इतिहास स्थळे त्यांनी पाहिली. उदा. कॉ. लेनिन खोली, उद्यान, महान स्मारक, अग्निकुंडची धगधगती आग, वस्तू संग्रहालय, राजमार्ग, रेखीव इमारती, फुटपाथ, आरशासरखे रस्ते, विविध पुतळे, विविध शहरे इत्यादी. रशियाच्या रस्त्यांवरून 'सप्तवार्षिक योजना' पूर्ण करण्यासाठी धावणारी लोकं अण्णांनी पाहिली. समाजवादाचे यश जनतेच्या खोल मनावर झाल्याचे त्यांना आढळून आले. गेल्या चाळीस वर्षात समाजवादाची प्रतिष्ठा रशियन जनतेने वाढवले आहे, हे ते प्रत्यक्ष डोळ्यांने आज पाहत होते. देशाच्या प्रगतीसाठी आणि देशातील प्रत्येक वस्तू स्वतःची आहे म्हणून काळजी घेणारा नवा समाज, रशियातील नवी दृष्टी आणि सृष्टी त्यांनी पाहिली. रशियाच्या भूतकाळाच्या खुणा, वर्तमानाची प्रगती आणि भविष्याची चाहूल अण्णा भाऊ साठे पाहत होते. ते रशियाचे अपयश शोधत होते. दारिद्र्य त्यांना तेथे दिसले नाही म्हणून हे 'महान ऑक्टोबर क्रांतीचे' यश आहे असे त्यांचे मत झाले. त्यांनी शाळा, महाविद्यालये, दवाखाने, सामुदायिक शेती इ. पाहिले. बोलशेव्हिक थिएटरात दगडाचे फुल ( नृत्य नाट्य रचना) हा ऑपेरा पाहताना नाट्यगृहात एकही जागा शिल्लक नसल्याचे त्यांना आढळून आले. एकावेळी दोनशे वादकांचा ताफा आणि नियोजन पाहून रशियन माणूस कला प्रेमी असल्याचे त्यांना जाणवले. एक बालनाट्य, एक सिनेमा, दिलराम नाटक, ही त्यांनी पाहिला. त्यातील प्रसंग वर्णन त्यांनी पुस्तकात केले आहे.
मास्कोत पहिले भाषण अण्णा भाऊ साठे यांनी मराठीत केले. त्याचे भाषण मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून रशियन भाषेत भाषांतर करणारे दोन दुभाषेके म्हणजेच दोन भाषेच्या जिभा मिळाल्या होत्या. हा संवाद पण एका ठिकाणी हस्यकल्लोळ करून जातो याची सुरेख मांडणी त्यांनी पुस्तकात केली आहे. पुढे त्यांनी 'बाको' शहर पाहिले. रशियात या शिष्टमंडळातील काही सदस्यांच्या हरवलेल्या वस्तू कॅमेरा, पेन, गिटार परत मिळाल्या म्हणून रशियाच्या योजना बद्ध व्यवहाराचे अण्णा भाऊ साठे यांना आश्चर्य वाटले. नंतर उझबेकिस्तान येथे परत ते आले. तेथे त्यांना बुरखा पद्धत दिसली नाही.
अण्णा भाऊ साठे सोव्हिएट रशियातील विविध क्षेत्रातील प्रगती पाहून अण्णा थक्क झाले. शेती सुधारणे बरोबर द्राक्षाची बाग आणि त्यांच्या १५ विविध जाती त्यांनी पाहिल्या. रशियन लोकांचा भारताबद्दलचा आदर आणि नेहरू वरील त्यांचे प्रेम अण्णा भाऊ साठे यांना जाणवले. रशियन लोक भारताला खरा मित्र मानतात. भारताचा ते अभ्यास करतात हे त्यांना जाणवले. मराठी आणि हिंदी भाषा शिकणाऱ्या शाळा रशियात त्यांनी पाहिल्या. रशियन लोकांना स्वातंत्र्य प्रिय असल्याचे त्यांना जाणवले. इतिहास जपणारे रशियन लोक त्यांना दिसली.
पुढे रशियातून भारताला येण्याचा दिवस उजाडला . रशियन जेट विमानांनी भरारी घेतली आणि विमान दिल्लीत आलं.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी खूप सुंदर असे प्रवास वर्णन केले आहे. संवाद लेखन मनाला भावते. विमान, मोटार, रेल्वे आणि पायांनी रशियाचा प्रवास यादगार अण्णा भाऊ साठे यांनी केलाच पण तो "माझा रशियाचा प्रवास" या प्रवास वर्णन लिहून चिरकाल पुस्तक रूपाने जिवंत ठेवला ! त्यांनी लिहिलेल्या 'माझा रशियाचा प्रवास' हे पुस्तक मला आवडल्यामुळे या पुस्तकावरून त्यांनी रशियात काय पाहिले ? त्यांना काय जाणवले ? त्यांचे विचार... थोडक्यात पुस्तक परीक्षण म्हणून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या कार्यावर लिहिलेला लेख आणि पुस्तक परीक्षण वाचून हा वाचक अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेले प्रवास वर्णन 'माझा रशियाचा प्रवास' हे त्यांचे पुस्तक आवर्जून वाचतील ही एक अपेक्षा !
पुस्तक : माझा रशियाचा प्रवास याचे लेखक : अण्णा भाऊ साठे आहेत तर या पुस्तकामध्ये प्रवास वर्णनाचे एकूण आठ भाग आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक गुलाबराव कारले आहेत . या पुस्तकाचे मूल्य ४०₹ रुपये आहे. हे पुस्तक वाचनीय असून आपण जरूर वाचावे असे मला वाटते.
अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगांव , तालुका- वाळवा, जिल्हा - सांगली येथे १ ऑगस्ट १९२० रोजी झाला . १८ जुलै १९६९ रोजी अण्णा भाऊ साठे यांचे निधन झाले. अण्णा भाऊ साठे यांना ४९ वर्ष आयुष्य लाभले.
साहित्यिक कलावंत यांना इथल्या वास्तवाबरोबर बाहेरच्या जगाचा कानोसा घेण्याची दूरदृष्टी हवी. असे मला वाटते. अण्णा भाऊ साठे यांनाही बाहेरच्या जगाची दूरदृष्टी होती. अनौपचारिक शिक्षणाचे विद्यापीठ असणाऱ्या अण्णांचे साहित्य, कथा आणि कादंबऱ्या मुलांना अभ्यासक्रमात अभ्यासासाठी आहेत. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा रशियाचा प्रवास हा त्यांचा आयुष्यातला महत्त्वाचा आणि प्रगतीचा टप्पा आहे असे मला वाटते. इथले साहित्यिक कोणत्या दृष्टीने त्यांच्या रशियाच्या प्रवासाला पाहतात हे मला माहित नाही परंतू मी मात्र गरिबीला पायदळी तुडवत, क्षितिजा पलीकडे पाहणारे, आपल्या लेखणीच्या जोरावर आणि कार्यामुळे रशियाला जाणारे अण्णा भाऊ साठे यांना मी मानतो. वाटेगावहून मुंबईसाठी येण्यासाठी पायी प्रवास करणारे अण्णा भाऊ साठे जेव्हा विमानाने रशियाचा प्रवास करतात. या प्रवासा पाठीमागे त्यांचे प्रचंड कष्ट आणि त्याग लपलेला आहे याची जाणीव होते !
(Copyright © लेखक जीवन संघर्षकार नवनाथजी रणखांबे. हे इंडियन टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड विजेते आहेत. मोबाईल : ९९६७४३५०३२)
No comments:
Post a Comment