किनवट : तेलंगणाच्या सिमेवर असलेल्या तालुक्यातील कोलामपोड या अतिदूर्गम आदिवासी कोलामवस्तीवर शनिवारी (ता. 13 ) "घरोघरी तिरंगा" चा अभिनव शुभारंभ करण्यात आला. चारी बाजूने डोंगर आणि जंगलाच्या सानिध्यात असलेले हे छोटे गाव व येथील आदिवासी बांधवांनी, महिलांनी आपले पारंपारिक गीत, नृत्य सादर करून अमृत महोत्सवी वर्षाला अभिवादन केले.
पारंपारिक वेशभूषेत असलेल्या अतिमामागास आदीम जमातील आदिवासी कोलाम महिला नागुबाई अर्जुन टेकाम यांच्या हस्ते त्यांच्या घरासमोर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तीकिरण पुजार, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी सुभाष धनवे , जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, बाल विकास प्रकल्पाधिकारी अश्विनी ठकरोड , महाजन अर्जून टेकाम ,गावातील ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व ग्राम पंचायत पिंपळगाव (सि) यांच्यावतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ' हर घर तिरंगा ' तिरंगा ह्या उपक्रमांतर्गत कोलामपोडावर आदिवासी महिलेच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
ध्वजरोहणापूर्वी कोलामपोडातील ज्येष्ठ महिला नागुबाई अर्जुन टेकाम , लक्ष्मीबाई रामा मडावी , भीमबाई राजाराम मडावी , नागुबाई लचु टेकाम, लक्ष्मीबाई रामा टेकाम रामबाई , लेता मडावी, रामबाई लक्ष्मण आत्राम यांनी कोलामी भाषेत स्वागत गीत गाऊन या अमृत महोत्सवी वर्षाला शुभेच्छा दिल्या.
मान्यवरांच्या हस्ते शहीद भगवान बिरसा मुंडा , राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शामादादा कोलाम यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करण्यात आले. लिंबगुडा येथील रहिवाशी व शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथे इयत्ता नववीत शिकणाऱ्या आदिम कोलाम समाजातील जयश्री भीमराव पुरके ही जवाहर नवोदय विद्यालयात प्रविष्ठ झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. ईटनकर यांचे हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. शासकीय आश्रम शाळा तलाईगुडा येथील विद्यार्थिनी व तलाईगुडा येथील युवकांनी आदिवासी ढेमसा नृत्य सादर करून मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी ग्रामस्थ राजाराम मडावी यांनी गावाच्या समस्या मांडल्या. ग्रामसेवक राऊत यांनी ग्रामपातळी वरील सर्व प्रश्न तातडीने सोडविण्याचे अभिवचन दिले. आमदार भीमराव केराम यांनी ग्रामस्थांच्या बोलीभाषेत विचार मांडले. प्रत्येक पाड्या- गुड्यावर समाजमंदीर देण्याची ग्वाही त्यांनी दिली. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने यांनी आभार मानले.
याप्रसंगी आदिवासी निरीक्षक स्मिता पहुरकर, संदीप कदम, केंद्र प्रमुख प्रतापसिंग राठोड, मुख्याध्यापक सचिन चव्हाण, जी. व्ही. चव्हाण, शंकर नागोशे , हमीद सय्यद , विनोद जक्कीलवाड , अभि. सचिन येरेकर, विस्तार अधिकारी एस.आर. शिंदे आदिंची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment