जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणारं व्यक्तिमत्व : बबन वानखेडे
-प्राचार्य सुरेश पाटील ,
आयुष्याच्या सुवर्ण प्रवासातील अनुभव, संघर्ष, सामाजिक जाणीव, पत्रकारितेची बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील प्रामाणिक कार्याचा ठसा उमटवत बबन रामराव वानखेडे हे आज ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. यानिमित्त त्यांच्या कार्याची सरेश पाटील यांनी करून दिलेली ओळख येथे देत आहोत. - संपादक
जगात काही माणसे वारसाने मोठे होतात, कुणाच्या पाठिंब्याने, मदतीने यशस्वी होतात. परंतू शून्यातून स्वकर्तुत्वाने यशस्वी झालेले दुर्मिळच असतात. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांना श्रद्धास्थान मानणारा वानखेडे परिवार.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अडवळणीच्या सिंदगी (मोहपूर) अतिदुर्गम आदिवासी गावात शेतकरी रामराव वानखेडे ( पिता) व लक्ष्मीबाई ( माता) यांच्या पोटी जन्म घेऊन कठोर मेहनतीने यशस्वी झालेले बबन वानखेडे आज ५१ वर्षात पदार्पण करीत आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी(गाव) व वसतीगृहात राहून जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा घोटी येथे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर धावजी नाईक वसतीगृहात राहुन सरस विद्यालय उमरी (बा ) येथे माध्यमिक शिक्षण घेतले. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किनवट येथे फिटरचा कोर्स करून कामासाठी मायावी नगरी मुंबई येथील मुकूंद लिमिटेड कंपनीत रुजू झाले. तिथे किरायाने खोली करून राहून सात वर्षे काम केले . यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या मुक्त शिक्षण संस्थेतून बी. ए. करून गावी आले.
सत्यशोधक पंढरीनाथ ठाकरे यांच्या प्रेरणादायी सल्ल्याने किनवट गाठून सेवा कम्प्युटर, सिद्धी डीटीपी व विठ्ठल श्रीमनवार यांच्या समवेत जीवन के साथ भी जिंदगी के बाद भी ब्रीद वाक्य असलेल्या एलआयसीचे एजंट म्हणून काम सुरू केले . २००९ ला एस. बी. आय. बँकेच्या किनवट शाखेत अधिकाऱ्यांच्या संपकीत आले. बँकेतून असंख्य गरजूंना कर्ज काढून दिले. त्या मध्ये मी पण आहे. गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांना लाभला . एकेक पैका जमवून त्यांनी प्रगती साधली. विद्यानगर गोकुंदा येथे टोलेगंज घरात ते मातोश्री समवेत राहतात. त्यांची मुले अभियंत्रिकीचं शिक्षण घेताहेत . पाठीशी पत्नी दिपालीची दीपज्योती समान साथ त्यांना लाभली.
सकाळी पाच वाजता उठून व्यायाम करून बॅडमिंटन खेळणे, ग्रंथ वाचणे, संगीत ऐकणे, अशी दिनचर्या सुरु होते . जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर नांदेड चौफेर, विष्णुपुरी एक्सप्रेस या वृत्तपत्रासह अग्रगण्य दैनिक लोकमतचे शहर प्रतिनिधी म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभाचं काम ते आज सांभाळत आहेत. अनेक गावं, वाडी, पाडा, वस्ती, तांडा येथील व्यक्तींसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत . त्यांचा लोकसंग्रह व्यापक आहे.
यावर्षी त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सवित्रीमाई फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त "जिजाई-सावित्रीमाई विचारांचा जागर" ह्या वैचारिक कार्यक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केले होते.
त्यांच्या आयुष्याच्या सुवर्ण प्रवासातील अनुभव, संघर्ष, सामाजिक जाणीव, पत्रकारितेची बांधिलकी आणि सार्वजनिक जीवनातील प्रामाणिक कार्याचा ठसा उमटवत बबन रामराव वानखेडे हे आज ५१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जीवनातील हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कायीला सलाम , त्यांना दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना.
-प्राचार्य सुरेश पाटील ,
संस्थापक , वामनदादा कर्डक संगीत अकादमी , किनवट
९९२११००५८०




No comments:
Post a Comment