हिमायतनगर ( प्रा.डॉ कैलास कानिंदे) : तालुक्यातील मौजे एकंबा येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा धम्म चळवळीतील अग्रणी उपासिका मातोश्री लक्ष्मीबाई खंडूजी कानिंदे (वय ९६ वर्षे) यांचे सोमवारी (ता. २३ फेब्रुवारी २०२६) दुपारी ४.०० वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या जाण्याने कानिंदे परिवारावर शोककळा पसरली असून संपूर्ण एकंबा गाव शोकमग्न झाले आहे. गावातील प्रत्येक स्तरातून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. मंगळवारी (ता. २४ फेब्रुवारी २०२६) दुपारी १.०० वाजता मौजे एकंबा येथील त्यांच्या शेतात अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
मातोश्री स्मृति.लक्ष्मीबाई खंडूजी कानिंदे या अत्यंत साध्या राहणीमानाच्या, कष्टाळू आणि संस्कारक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित होत्या. त्यांनी आयुष्यभर कुटुंबसंस्था मजबूत ठेवण्यासाठी परिश्रम घेतले. घरातील पिढ्यान्पिढ्यांना संस्कारांची शिदोरी देत त्यांनी सामाजिक सलोखा, माणुसकी आणि आपुलकीचे धडे दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कानिंदे परिवारात ऐक्याची भावना दृढ झाली.
समाजात त्यांचे वर्तन नेहमीच समंजस, शांत व मार्गदर्शक स्वरूपाचे राहिले. गावातील सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेत असत. गरजू व्यक्तींना मदतीचा हात देणे, सण-उत्सव साजरे करताना सर्वांना एकत्र आणणे, ही त्यांची खासियत होती. त्यामुळे त्यांच्या जाण्याने गावाने एक मायेची सावली गमावली असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात ४ मुलगे, ४ सुना, २ मुली, जावई, नातू- पंतू असा मोठा परिवार आहे. भीमराव खंडूजी कानिंदे (माजी सरपंच, एकंबा), भोजराज खंडूजी कानिंदे, अभि. भरतकुमार कानिंदे ( थायलंड रिटर्न माजी श्रामणेर व बानाईचे कार्यकर्ते), गौतम खंडूजी कानिंदे आणि मंजुश्रीताई स्मृति. घनश्याम पाटील व आशाताई अभि.अशोक येरेकार यांच्या त्या मातोश्री असून छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता अशोक येरेकार यांच्या त्या सासूबाई होत.
मातोश्री स्मृति. लक्ष्मीबाई कानिंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बुधवारी (ता. २५ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी ७.३० वाजता मौजे एकंबा येथे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सप्त खंजिरीवादक सत्यपाल महाराज यांचा समाज प्रबोधन कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमातून व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक ऐक्य, नैतिक मूल्यांची जपणूक यांसारख्या विषयांवर प्रबोधन केले जाणार आहे.
मातोश्रींच्या जीवनकार्याला खरी आदरांजली म्हणून हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याचे कानिंदे परिवाराने सांगितले. या पुण्यानुमोदन कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कानिंदे परिवार व समस्त गावकरी मंडळी, एकंबा यांच्या वतीने करण्यात आले आहे.




No comments:
Post a Comment