किनवट : किनवट-माहूर तालुक्यात दि. 1 व 2 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीसंदर्भात आमदार भीमराव केराम यांनी दि. 6 सप्टेंबर रोजी मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व दोन्ही तालुक्यातील नुकसानीची विदारक अवस्था त्यांच्यासमोर मांडून सरसकट शेतकऱ्यांना तातडीने अर्थसाह्य देण्याची मागणी केली या मागणीला देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
दि.31 ऑगस्ट पासून किनवट-माहूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. दि 1 व 2 सप्टेंबर रोजी दोन्ही तालुक्यातील सर्वच महसुली मंडळात अतिवृष्टी झाल्याने हाता तोंडाला आलेल्या उभ्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार किनवट तालुक्यात 57700 हे. तर माहूर तालुक्यातील 18920 हे. शेतीक्षेत्र बाधित होऊन कापूस , सोयाबीन , ज्वारी, तूर, मूग, उडीद व मका ही पिके जमीन दोस्त झाली आहेत. अनेक शेतकऱ्यांचे पशुधन मृत पावले आहेत ; तर वादळी वाऱ्याच्या पावसात शेकडो घरांची पडझड झाली. या पूर परिस्थितीचा आढावा घेऊन किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांनी 2 सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले व दि 6 सप्टेंबर रोजी तातडीने मुंबई गाठून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. भेटी दरम्यान आ. केराम यांनी किनवट -माहूर तालुक्यातील नुकसानीच्या अद्यावत माहितीचे निवेदन सादर करून देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. चर्चेदरम्यान त्यांनी किनवट विधानसभा क्षेत्रातील सरसकट शेतकऱ्यांना व पडझड झालेल्या घरांना राज्याच्या आपत्ती विभागाकडून अर्थसहाय्य मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे लोकार्पण जनसंपर्क कार्यालयातून सांगण्यात आले आहे.




No comments:
Post a Comment