किनवट : नगर परिषद/नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूका-२०२५ करिता झालेल्या मतदानाची मतमोजणीचा आता ता. २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार असल्याचा आदेश राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रचे सचिव सुरेश कांकाणी यांच्या स्वाक्षरीने प्राप्त झाल्याचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर यांनी कळविले आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रच्या वतीने दिनांक:- ०२/१२/२०२५ रोजी क्रमांक-रानिआ/नप-२०२५/प्र.क्र.१४/का-६ या क्रमांकाचा आदेश निर्गमित झाला असून मतमोजणीचा दिनांक पुढे ढकलल्याबाबत मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ यांचे आदेशानुसार कार्यवाहीबाबत सूचविले आहे.
आयोगाच्या दिनांक ०४/११/२०२५ च्या आदेशान्वये राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दिनांक ०२/१२/२०२५ रोजी मतदान आणि दिनांक ०३/१२/२०२५ रोजी मतमोजणी नियोजित होती. तसेच न्यायालयीन अपील दाखल झाल्याने बाधित नगरपरिषदा/नगरपंचायतींकरिता सुधारीत निवडणूक कार्यक्रम दिनांक २९/११/२०२५ रोजी निर्गमित करण्यात आला व त्याचे मतदान दिनांक २०/१२/२०२५ तर मतमोजणी दिनांक २१/१२/२०२५ रोजी नियोजित होती. ज्याअर्थी मा.मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे दाखल झालेल्या रिट याचिका क्र.WP/७५०८/२०२५ या याचिकेमध्ये दिनांक ०२/१२/२०२५ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये दिनांक ०३/१२/२०२५ रोजी होणारी मतमोजणी ही दिनांक २१/१२/२०२५ रोजी घेण्यात येऊन निकाल घोषित करण्यात याव्यात असे आदेश मा. न्यायालयाने निर्गमित केले आहेत.
त्याअर्थी, पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमान्वये नियोजित असलेला दि.०३/१२/२०२५ रोजीचा मतमोजणीचा दिनांक मा. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे ढकलण्यात येत आहे आणि सदर मतमोजणी, सुधारित निवडणूक कार्यक्रमांतर्गत नियोजित असलेल्या मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि.२१/१२/२०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून घेणेबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित करण्यात आले आहे.
तसेच असे करताना खालील सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे. असेही सूचविल आहे.
(i) दि.०२/१२/२०२५ रोजीचे मतदान पार पडल्यानंतर ईव्हिएम ची योग्य हाताळणी व सुरक्षित साठा ठेवण्याबाबत आयोगाच्या दि. १६/०८/२०१६ च्या आदेशाचे तसेच दि.१४/०२/२०२४ रोजीच्या आदेशान्वये देण्यात आलेल्या सविस्त्र सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
(ii) आयोगाने दि. १४/०२/२०२४ च्या आदेशान्वये गोडाऊनच्या साठवणूक व व्यवस्थापनाकरिता जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
(iii) मतदान यंत्र साठवणूक ठिकाणालगत सुरक्षा उपकरणे (सीसीटिव्ही, सुरक्षा अलार्म सिस्टीम, Exhaust Fan, Fire Extinguisher, Vacuum cleaner) इत्यादी कार्यान्वित असल्याची खात्री करावी. याशिवाय आवश्यक तेथे बॅरेकेटींग करण्यात यावे.
(iv) मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या गोडाऊनसाठी २४ तास सशस्त्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात असावी. साठवणुकीच्या ठिकाणी केवळ व अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्यात यावा व अशा प्रवेशाचा तपशिल लॉगबुकमध्ये नोंदविण्यात यावा.
(v) दि.२१/१२/२०२५ रोजी मतमोजणी होणार असल्याने, मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रांवरील ऑन ऑफ स्विच लक्षपूर्वक बंद करणे आवश्यक आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान यंत्र पेटीत ठेवण्यापूर्वी त्याचा स्विच बंद असल्याचे खात्री करुनच ते पेटीत ठेवण्यात यावे. तरीही मतमोजणीच्या वेळी low battery असा मॅसेज मतदान यंत्र दाखवित असल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या रानिआ/मनपा-२००५/प्र.क्र.१८/का-५, दि.१३/०६/२००५ च्या आदेशान्वये कार्यवाही करुन मतमोजणी पूर्ण करण्यात यावी.
(vi) राजकीय पक्षांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधींना गोडाऊन व सुरक्षा व्यवस्थाबाबत अवगत करावे. जेणेकरुन आवश्यकतेप्रमाणे / त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना गोडाऊन सुरक्षेबाबत पाहणी करता येईल. तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र साठवणूकीच्या गोडावूनचे द्वार दिसेल अशा ठिकाणी बसण्यासाठी जागा निश्चित करून द्यावी.
तरी, वरील निर्देशांचे कोटेकोरपणे पालन करुन मतमोजणीची व निकाल घोषित करण्याची प्रक्रिया नियमानुसार पार पाडावी व त्याबाबतचा अहवाल आयोगास सादर करावा. असे राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्रचे सचिव सुरेश कांकाणी यांनी आपल्या स्वाक्षरीने दिलेल्या आदेश नमूद केले आहे.




No comments:
Post a Comment