किनवट : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी विकत घेतलेले सोयाबीन पिकाचे बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून यावर खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि गॅरंटीवर बियाणे विकणाऱ्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली असून तसे निर्देश हिंगोली, नांदेड, यवतमाळ जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्याना दिले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात मृगाच्या सुरवातीला समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली. यासाठी बाजारातून चांगल्या कंपनीचे सोयाबीन बियाणे विकत घेतले. कृषी विक्रेत्याकडून घेतलेल्या विविध कंपन्यांचे बियाणे वांझ निघाले. ते बियाणे उगवलेच नाही . तसेच काही ठिकाणी खरेदी विक्री संघाकडून खरेदी केलेले महाबीजचे बियाणे सुद्धा उगवले नाही . हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड, महागाव तालुक्यातील तरोडा , कृष्णापूर, पाऊणमारी , मुळावा,मानेगाव ,जेवली, मथुरानगर , वरुड ( बीबी ) आदी गावातील १४३ शेतकऱ्यांनी तसेच इतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे आणि खासदार हेमंत पाटील यांच्या कडे तक्रारी दाखल केल्या. याची दखल घेत खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन बोगस बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि विक्री करणारे विक्रेते यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली असून कारवाई करण्याचे निर्देश हिंगोली,नांदेड,यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक ,आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत . कोरोनामुळे आधीच हवालदिल असलेल्या शेतकऱ्यांवर बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे . मागील बऱ्याच दिवसापासून हिंगोली , यवतमाळ , नांदेड जिल्हयात कापूस, सोयाबीनचे बोगस बियाणे विक्री होत असल्याचे बोलले जात होते. पण याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, त्यामुळे बोगस बियाणे कंपन्या आणि विक्रेत्यांची हिंमत धजावली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा संसर्ग रोखण्यात व्यस्त असतानाही कृषी विभाग या सर्वातून गाफील राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात बनावट बियाणे विकल्या गेल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तर काही ठिकाणी महामार्गाचे काम चालू असून त्यामुळे पुलाच्या ठिकाणी पाणी साचल्याने हजारो हेक्टर वरील पेरलेले बियाणे वाहून गेले असल्याने सुद्धा शेतकरी हैराण झाले आहेत. याबाबत सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत . अस्मानी आणि सुलतानी संकटाने शेतकरी नेहमीच भरडला जात आहे. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नबाबत खासदार हेमंत पाटील सदैव प्रथम प्राधान्य देऊन भूमिका घेत असतात.




No comments:
Post a Comment