आसिफाबाद (तेलंगाणा ): अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या पहिल्या अ. भा . आंबेडकरी कला महोत्सवाची आयोजन सभा नुकतीच लुम्बिनी बुद्ध विहार येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अशोक माहोलकार होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने प्रशांत वंजारे आणि मधू बावलकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 1956 च्या धम्मक्रांतीने सजग झालेला समुदाय नव्याने आपले अस्तित्व शोधू लागला. आंबेडकरी वैचारिकतेनुसार तो व्यक्त होऊ लागला. याच प्रवज्जीत झालेल्या लोकांनी नव्या कलांना जन्म दिला. आंबेडकरी जलसा, आंबेडकरी नाट्य, आंबेडकरी कव्वाली अशा बहुविध कलांचा उपयोग करून आंबेडकरी लोकांनी परिवर्तनाची चळवळ धारदार बनविली. या बहुविध कलांना राजाश्रय नाही म्हणून आंबेडकरी समाजाने स्वतःच्या हिमतीवर या कला जगविल्या पाहिजे. त्यासाठी या कलांची जपणूक व्हावी म्हणून, या कलांना आणि कलावंतांना मंच उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी आंबेडकरी कला महोत्सवासारखे आयोजन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रशांत वंजारे यांनी केले. आपण सर्वांनी मिळून हा महोत्सव यशस्वी करू अशी ग्वाही प्रसिद्ध कवी आणि ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते मधू बावलकर यांनी दिली.
यावेळी लुंबिनी दीक्षाभूमीचे अध्यक्ष तिरुपती दुर्गे, शेरू सय्यद, पुल्लय्या कांबळे , तुकाराम जीवने, तुकाराम चुनारकर , प्रतीक मुनेश्वर, शंकर नागोशे, तोटापल्ली भूमण्णा, गेडाम हिरिशन , शामराव दुर्गे, एन. शंकर, दुर्गम शंकय्या आदींनी समयोचित विचार मांडले. विनेश उपरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.




No comments:
Post a Comment