आज कोविड १९ ने देशाला आणि जगाला वेठीस धरले असले तरी काही देश कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले आहेत. हे ही दिवस जातील यावर माझा अटल विश्वास आहे. कोणतीच परिस्थिती तशीच राहत नाही. परिस्थिती वेळ आणि काळानुरुप बदलत असते. कोरोनावरती Covaxin आणि Covishield लस निघाली. ती लस टप्या टप्याने सर्वांना मिळणारच आहे. अदृश्य शत्रू बरोबर लढाई असताना गाफील राहणे जीवावर बेतते . हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे.
जो गाफील राहिला ...
तो जीवाला मुकला...
म्हणून गाफील न राहता शासनाने दिलेल्या नियमात राहून कोरोनाला हरवण्यासाठी उपाय योजनांचे काटेकोर पालन करायला हवेच . स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला हवी.
*कोरोना सारख्या जैविक विषाणूच्या कहराकडे कांही लोकं गांभीर्याने पाहत नाहीत*
आजची परिस्थिती पाहता हे सत्य नाकारता येत नाही.
१) मास्क न घालणे.
२) हात साबण आणि सॅनिटायझरने न धुणे.
३) विनाकारण फिरणे.
४) कोरोना हा विषाणू नाही या अविर्भावात कांही लोकं वागतात आणि चुकीच्या पद्धतीने कोरोना विषयी बेताल वक्तव्य करून कोरोनाबद्दल चुकीची माहिती देऊन चर्चा करतात. ( त्यामुळे कोरोनाबद्दल जनमानसात गैर समज निर्माण होतो. हे थांबले पाहिजे. )
५) आपली आणि कुटुंबाची कोरोनापासून काळजी न घेणे
असे बारीक निरिक्षण केले असता दिसून येते.
या अदृश्य कोविड १९ या विषाणू विरुद्ध गाफील राहून वागल्यामुळे परिणामी माणूस संसर्गाचा बळी होतो आणि संसर्ग वाढण्यास हीच गाफील लोकं जबाबदार होतात. यामुळे चिकित्सक आणि डोळस वृत्तीने प्रत्येकाने वागायला हवं. आपली आणि कुटूंबाची काळजी घ्यायला हवी तर उद्याचा दिवस आपला आहे . लॉकडाऊन काळात घरी राहणे हे सुरक्षितपणाचे लक्षण आहे. मग प्रश्न पडतो लॉकडाऊन काळात घरी राहून करायचे काय ???
आज कांही जवळची माणसं कोरोनामुळे मृत्यू पावत आहे. हे ऐकून खूप वाईट वाटते. खूप अस्वस्थ होते. कांही माणसं कोरोनावर मात करून सुखरूप घरी येत आहेत. हे ऐकून आनंद होतो. या सर्व घटनेचा आपल्या मनावर कळत न कळत परिणाम होत असतो. मुळात कोरोनाच्या या जागतिक आणीबाणीला लक्षात घेता. त्याच्यावर मात कशी करायला हवी हे लक्षात घ्यायला हवं. डॉक्टर , तज्ज्ञ सल्लागार आणि शासन यांनी सांगितलेल्या नियमात वागायला हवं.
प्रत्येक अडचणीस सकारात्मकतेने घेतल्यास आणि संकटास न घाबरत सामोरे गेल्यास विजय आपला नक्कीच आहे.
*लॉकडाऊन काळात आपण काय करायला हवं* :-
१) विनाकारण फिरणे टाळायला हवे.
२) मास्क वापरायला हवा.
३) हाताला साबण अथवा सॅनिटायझरने स्वच्छ करायला हवे.
४) अत्यावश्यक कारणासाठी बाहेर जाऊन परत घरी आल्यावर सकाळ आणि संध्याकाळ वाफ घ्यायलाच हवी .
५) दररोज व्यायाम करायला हवा.
६) भरपूर पाणी प्यायला हवे.
७) दररोज सकस आहार ( अंडी इ.) घ्यायला हवा
८) आपल्या आवडी निवडी घरात जपायला हव्यात :-
पुस्तक वाचण करणे आणि लेखन करणे , घरात इन डोअर गेम कुटूंबा सोबत खेळायला हवे, मुलांनी घरात अभ्यासाची उजळणी होईल असे खेळ खेळायला हवेत. आपल्या आवडी निवडी काय आहेत, त्या जपायला हव्यात. उदा. कोणाला गाणी म्हणायची आवड असेल तर कोणाला सिनेमा पाहण्याची आवड असेल तर कोणाला स्वयंपाक ( विविध रेसिपी) करण्याची आवड असेल , तर कोणाला बुद्धिबळ , कॅरम, इ.खेळ खेळण्याची आवड असेल . आपल्या आवडणाऱ्या क्षेत्रात स्वतःला गुंतवून घ्या. वेळ कसा जाईल कळणारही नाही .
९) टेलिव्हिजन वरील कोरोना संबंधित बातम्या पाहणे टाळायला हवे :-
काही लोकं बातम्या पाहून खूप भय भीत होतात. अशी माणसे कोरोनाची लागण झाल्यास कोरोना ऐवजी घाबरूनच मरतात,
१०) जीवनाकडे पाहण्याची आणि जगण्याची सकारात्मक वृत्ती हवी.
११) दुरावलेले नाते संबंध जवळ करण्याची संधी
हा काळ धावपळीचा आहे . कामधंद्यामुळे आज एकमेकांशी संवाद दुर्मिळ होत चालले आहे. लॉकडाऊन काळात जुने आणि नवीन नाते संबंधातील प्रत्येकांना फोन करून खुशाली आणि गप्पा गोष्टी कराव्यात . आपुलकीने विचार पूस करावी त्यामुळे नाते संबंध पुन्हा सुरळित होतील. घरात गप्पागोष्ट करत जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकतो.
१२) गृह उद्योग करायला हवेत :- आज गृह उद्योगासाठी मनुष्यबळ कमी पडते. मिडीयाचा आणि तज्ज्ञ सल्लागारांचा सल्ला घेऊन घरातल्या घरात व्यवयास करू शकतो. घरगुती वस्तू ,खाद्यपदार्थ, अथवा आपण बनवू शकतो त्या वस्तूची निर्मिती करू शकतो. घरात कॅप्युटर अथवा लॅपटॉप असल्यास ऑनलाइन डेटा इन्ट्री , इ. सारखी घरात कामे करून पैसे मिळवू शकतो.
*कोरोनाने काय शिकवले* :-
१) जैविक संशोधनाची आधुनिक प्रयोग शाळा निर्मिती:-
जैविक संशोधनासाठी आधुनिक प्रयोग शाळा निर्माण करून मानव निर्मित आणि नैसर्गिक साथीच्या रोगावर उपचारात्मक उपायासाठी संशोधन करणे काळाची गरज आहे.
२) ऑनलाइन विद्यापीठाची स्थापना :-
कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऑनलाइन विद्यापीठ स्थापन करून त्याचा प्रचार, प्रसार आणि शैक्षणिक सोपे प्रयोग, विविध अभ्यासक्रम समाविष्ट करून वेळ, काळ, पैसा या ऑनलाइन विद्यापीठाने आपण वाचवू शकतो. मानव निर्मित आणि निसर्ग निर्मित साथीच्या आजारात याचा चांगला फायदा होऊ शकतो.
३) भविष्याची आर्थिक तरतूद:-
भविष्याची आपण सर्व जन आर्थिक तरतूद करत असतो. ज्या आणीबाणी काळासाठी पैसे बाजूला काढून साठवले जाते त्यांचा आणीबाणीच्या काळात मोठा फायदा होतो. या कोरोना संकटाने भविष्यात अशी परिस्थिती परत उदभवल्यास साथीच्या आजरात आपले बजेट कोलमडू नये म्हणून त्याची आर्थिक तरतूद आपण अगोदर करायला हवी. हा धडा मिळतो.
४) आरोग्यावर खर्च :-
मोठे मोठे आधुनिक दवाखाने निर्माण करणे. कमी खर्चात औषध उपचार करणे . आरोग्य विभागास मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणे. आरोग्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधायुक्त दवाखाने इत्यादींच्या निर्मितीसाठी मोठ्या देणग्या आणि दान देणे ही काळाची गरज आहे . काळाची पाऊले ओळखून आरोग्य विभागावर खर्च केला पाहिजे .
५) घरगुती व्यवसायास चालना:-
घर बसल्या व्यवसाय करून कोरोना सारख्या आणीबाणीच्या काळात आर्थिक बाजू भक्कम ठेवण्यास मदत होते म्हणून घरगुती व्यवसाय प्रशिक्षण देणे घेणे काळाची गरज आहे.
( लेखक नवनाथ रणखांबे हे आंतरराष्ट्रीय , राष्ट्रीय, राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित असून विविध बुक ऑफ रेकॉर्ड धारक आहे)




No comments:
Post a Comment