मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आदी मान्यवर उपस्थित होते.
ध्वजारोहण समारोहानंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे, मंत्री श्री. थोरात, मंत्री श्री. वळसे-पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने शासनाचे यासंदर्भातील नियम पाळून अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम करण्यात आला.
महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना अभिवादन
मुंबई, दि. १ : संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे नियम काटेकोरपणे पाळून अत्यंत साधेपणाने हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्याही शुभेच्छा दिल्या.




No comments:
Post a Comment