नांदेड (नंदकुमार अभंगे) : नांदेड वाघाळा शहर मनपाने मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेसाठी कार्यालय व रंगशारदा दालन उपलब्ध करून दिले आहे. सुमारे आठ दशकापूर्वी नांदेड येथेच साहित्य परिषदेची स्थापना झाली, पण साहित्य परिषदेला स्वतःची जागा नव्हती. ही गरज लक्षात घेऊन महापालिकेने परिषदेला जागा दिली. त्यामुळे या परिसरातील वाङ्मयीन चळवळ गतीमान झाली आहे, असे प्रतिपादन प्राचार्य कौतिकराव ठाले -पाटील यांनी केले.
परिषदेच्या नांदेड शाखेने आयोजित केलेल्या कृतज्ञता समारंभाच्या अध्यक्ष पदावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती अपर्णा नेरलकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना ठाले-पाटील पुढे म्हणाले, खरं म्हणजे हैदराबाद मुक्ती संग्रामाचे आणि साहित्य परिषदेचे कार्यकर्ते त्यावेळी एकच होते. जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी निर्माण झालेली ही जगातील एकमेव साहित्यिक संस्था होय. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्यिक देवीदास फुलारी यांनी केले. यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर्णा नेरलकर, प्रभाकर कानडखेडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर कदम यांनी केले तर आभार ऍड. विजयकुमार भोपी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे कार्यवाह महेश मोरे, धाराशिव शिराळे, कुमार अभंगे, साईनाथ यांनी विशेष परीश्रम घेतले. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.




No comments:
Post a Comment