नांदेड : गोदावरी अर्बन परिवारातील ज्येष्ठ सदस्य , आस्थापना अधिकारी स्व. शिवाजी माने यांचे शुक्रवारी (ता.५) मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर येथील गोवर्धनघाट स्मशानभूमित शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर दिवंगत शिवाजी माने यांना गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या उपस्थितीत सहकारसूर्य मुख्यालयात सायंकाळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा खासदार हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी स्व. शिवाजी माने यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. याप्रसंगी संचालक प्रा. सुरेश कटकमवार, मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, मुख्य शाखा अधिकारी अविनाश बोचरे, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अंत्यंत मनमिळावू आणि सर्वांना नेहमीच समजुन घेणारे दिवंगत शिवाजी माने यांना श्रद्धांजली अर्पण करताना सहकारसूर्य मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना अश्रृ अनावर झाले होते. यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी शोकसभेत बोलताना दिवंगत माने यांच्या सारखा प्रशासनातील प्रचंड अनुभव असणारी व्यक्ती गोदावरी परिवाराचा हिस्सा होती आणि आज ती व्यक्ती आपल्यात नाही हे मनाला पटत नाही. माने परिवारावर जो दुःखाचा डोंगर ओढवला आहे. तोच प्रसंग गोदावरी परिवारावर ओढवला आहे. या दुःखद प्रसंगातून गोदावरी परिवार आणि माने परिवारास सावरण्याचे बळ मिळो अशी भावना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment