नांदेड, ता.8 : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी जिल्हयातील 3 हजार 739 शाळांमधून देशभक्तीपर गीतांचे समूहगाण या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिक्षण विभागाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
हर घर तिरंगा या उपक्रमातंर्गत आज बुधवारी सकाळी 10 वाजता 10 देशभक्ती गीतांचे समूह पद्धतीने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या 3 हजार 739 शाळांमधून देशभक्तीपर समूहगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी विपीन ईटनकर व मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम जिल्हयाती सर्व जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधून राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या 2 हजार 197 शाळा, महानगरपालिकेच्या 17 तर 1 हजार 525 संस्थेच्या शाळा असे एकूण 3 हजार 739 शाळा सहभागी होणार आहेत. देशभक्तीपर समूहगीत गायनात एकाच वेळी सर्व शाळांमधून सुमारे 6 लाख 67 हजार 721 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी 10 देशभक्तीपर गीत समूह स्वरात विद्यार्थी गाणार आहेत. यात वंदे मातरम, जयोस्तुते श्री मह्ममंगले, नन्ना मुन्ना राही हू, आओ बच्चो तुम्हे दिखाये, छोडो कल की बाते, हम होंगे कामयाब, सारे जहाँ से अच्छा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, बलसागर भारत होवो व ये देश है वीर जवानों का.. या देशभक्तीपर गीतांचा समावेश आहे. प्रत्येक गीतातील एक-एक कडवे यावेळी गायले जाणार आहेत. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होणार आहे. यासाठी सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी सुयोग्य नियोजन करुन देशभक्तीपर समूहगाण कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment