किनवट : येथील गट शिक्षणाधिकारीपदी पदोन्नतीने रुजू झालेले ज्ञानोबा रामनाथ बने यांचा केंद्रप्रमुख, विषय तज्ज्ञ व शिक्षकांनी सत्कार केला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, केंद्रप्रमुख रमेश राठोड, रामा उईके, वरिष्ठ सहाय्यक जुगनूसिंग दीक्षित, पदवीधर विषय शिक्षक रवी नेम्माणीवार, मानव विकास समन्वयक उत्तम कानिंदे सहशिक्षक मारोती भोसले, गोपाळ कनाके, विनोद पांचाळ, व्यंकटेश शर्लावार आदींसह गट साधन केंद्रातील विषय तज्ज्ञ उपस्थित होते.
नूतन गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने हे मु.पो.ढाळेगाव ता. अहमदपूर जि. लातूर येथील रहिवासी असून त्यांचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मूळगावी जिल्हा परिषद शाळेत झाले. लहानपणापासूनच त्यांना खेळाची आवड होती.
त्यांनी 1987 मध्ये संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालय धामणगाव ता.शिरूर आनंतपाळ जि.लातूर येथे एक वर्ष सह शिक्षक म्हणून त्यांनी सेवा केली. बी.एड्. पूर्ण केल्यानंतर सन 1989 ते 1992 दरम्यान रवींद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर येथे गणित विषयाचे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. खासगी अनुदानित संस्थेत कर्तव्य बजावत असतानाच 11 मार्च 1992 रोजी जिल्हा परिषद प्रशाला अंदोरी ता.अहमदपूर जि. लातूर येथे रुजू झाले. याच शाळेत 31ऑक्टोबर 2006 पर्यंत माध्यमिक शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर 1 नोव्हेंबर 2006 रोजी पदोन्नती अराजपात्रित मुख्याध्यापक म्हणून जिल्हा परिषद कन्या प्रशाला, चाकूर जि. लातूर येथे रुजू झाले. येथे सेवारत असतांना त्यांची पदोन्नती झाल्याने येथील गट शिक्षणाधिकारीपदी रुजू झाले.
मनाने खूप प्रांजळ, प्रामाणिक, शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष, कार्यतत्पर, मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची खाती आहे. एक उत्कृष्ट क्रीडापटू, क्रीडाशिक्षक, क्रीडा खेळाडू म्हणून संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये त्यांची ख्याती आहे. त्यांच्या शिक्षकी पेशामध्ये आजपर्यंत 100 पेक्षा जास्त राष्ट्रीय कबड्डी खेळाडू त्यांनी घडवले आहेत. त्याचबरोबर असंख्य डॉक्टर, इंजिनियर, नगरपालिका सीईओ अनेक प्रशासकीय अधिकारी त्यांचे विद्यार्थी आहेत. नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा पर्यवेक्षक प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ तसेच हॉलीबॉलचे ते उत्कृष्ट खेळाडू आहेत. क्रीडा बरोबर सुंदर हस्ताक्षर यावर सुद्धा त्यांचा जास्त भर आहे. येणाऱ्या काळात किनवट आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांसाठी क्रीडाविषयक अनेक स्पर्धा व संधी उपलब्ध करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणून ओळख असलेला बाला ( BALA) उपक्रम लोकसहभागातून शाळा भौतिक सुविधांनी परिपूर्ण करणे तालुक्यात राबवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment