भोकर : तालुक्यात मागील ३ दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे सर्वच नद्या नाल्याना पूर आले असून मंगळवारी (ता.०३ ऑग) दुपारी १२ वाजताच्या सुमारास सुधा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेले मौजे रेणापूर येथील दोन तरूण बेपत्ता असल्याची भिती व्यक्तविली जात आहे.
शनिवारपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून पावसाचा जोर अद्यापही कायम असल्याने परिसरातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मागील २४ तासात सरासरी ५.३० मिमी व एकुण सरासरी ६८२.८० मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार सुरेश घोळवे यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला असतानाही बुधवारी (दि.०३) मौजे रेणापुर येथील पाच तरुण सुधा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते. त्याना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यातील श्रीनिवास भरत मुळेकर (वय २० वर्षे) व यश संदीप भगत (वय १९ वर्ष) हे दोन तरुण अद्यापही बेपत्ता असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. हे दोघेही आई-वडिलांना एकूलते एक होते. बाकी तिघेजण परिस्थिती पाहुन नदीपात्रात उतरल्याने नव्हते. तिरावरील या तिघांनी आरडाओरड करून लोकांना मदतीची हाक दिली. दरम्यान त्यांना मदत मिळेपर्यंत पाण्याच्या तेज प्रवाहात हे दोघेही अदृश्य झाले.
तहसीलदार यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी मंडळ अधिकारी मनोजकुमार कंधारे, तलाठी रुपेश जाधव , तलाठी गोदरे, ग्रामसेवक विकास भारती , पोलीस पाटील श्रीराम सुर्यवंशी यांना घटनास्थळी पाठवून शोध मोहिमेचे कार्य जोमाने सुरू केले. तसेच पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड व त्यांचे सहकारी सुद्धा घटनास्थळी येऊन शोध कार्य करीत आहेत . या बचाव कार्यात रेणापुर तसेच कोळगाव येथील ग्रामस्थ मंडळी मदत करीत आहेत. परंतु अद्यापही या दोन्ही तरुणाचा शोध लागलेला नाही. अशी माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावरून दिली.




No comments:
Post a Comment