छत्रपती संभाजीनगर : स्वतंत्र्य, समता आणि बंधुता सांगणारे बुद्ध विचारच या देशाचा सर्वांगीण विकास घडवून आणू शकतात. आज बुद्ध धम्म हा विश्व धम्म बनत चालला आहे. आमचा प्राचीन धर्म हा वैदिक किंवा ब्राम्हणी धर्म नसून बौद्ध धम्मच आहे, हे आता जवळजवळ सिद्ध होत आहे. त्यामुळे ज्यांनी हे चुकीचे पेरण्याचे षडयंत्र केले होते ते अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते कोणती चाल आणखी चालतील हे ओळखता येणार नाही, त्यामुळे आपण सजग, जागृत राहून संस्कृती टिकविण्यासाठी बुद्ध विहारांमध्ये समन्वय साधण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन, चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.
ते स्थानिक संत एकनाथ रंगमंदिर येथे बुद्ध विहार समन्वय समिती द्वारा आयोजित दोन दिवसीय बुद्ध विहारोंका 3 रा राष्ट्रीय अधिवेशन च्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी भिक्खू विनयरक्खीता महास्थवीर (मध्यप्रदेश) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. धनाजी गुरव, प्रदीप चकमा (त्रिपुरा), प्राचार्य डॉ. एम.ए. वाहुळ, स्वागताध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, चेतन कांबळे, बुद्ध विहार समन्वय समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सरस्वती आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना अशोक सरस्वती बौद्ध म्हणाले की, बुद्ध विहारांच्या पदाधिकाऱ्यांत समन्वय नसल्यामुळे बुध्द विहारांची सांस्कृतिक चळवळ उभी राहू शकली नाही. ती उभी करण्याचा राष्ट्रीय पातळीवरील हा उपक्रम आम्ही सुरू केला. आज 23 राज्यातील प्रतिनिधी या उपक्रमाशी जुळलेले आहेत. या उपक्रमाद्वारे भारत बौद्धमय करण्यामध्ये योगदान देण्याचे काम बुद्ध विहार समन्वय समितीद्वारे केले जात असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी 8:00 वाजता पुज्यनिय भिक्खू संघ आणि समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत धम्म ध्वजारोहण आणि मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर भिक्खू डॉ. चांद्रबोधी, भिक्खू ज्ञानरक्षित आणि भिक्खू संघाच्या उपस्थितीत वंदना व सुत्तपठन घेण्यात आले. त्यानंतर प्रा. भारत सिरसाट संपादित स्मरणिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी या अधिवेशनाद्वारे करण्यात आली. तसेच त्यासाठी होणाऱ्या आंदोलनात देशभरातून जनआंदोलन उभे करण्याचा ठराव या अधिवेशनात घेण्यात आला.
कॉ. धनाजी गुरव बोलताना म्हणाले की, बौद्ध धर्माची दीक्षा न घेता जे लोक, जे समूह बुद्ध विचारांचे आचरण करतात, त्या समूहांना बौद्ध समाजाकडे वळविण्यासाठी ठोस कार्यक्रम निर्माण करण्याची आवश्यकता असून त्याची मोठी जबाबदारी बुद्ध विहारांची आहे. आरएसएसने भारतातील लोकशाही संपविण्याचे धोरण आखले आहे. प्रतिकांचे, महापुरुषांचे त्यांना पूरक होईल त्या पद्धतीने मांडण्याचे काम सुरू आहे, लोकशाही वाचविण्यासाठी बुद्ध विचारांची पेरणी व्यापक स्वरूपात होण्याची आवश्यकता आहे.
अध्यक्षीय समारोप करताना भिक्खू विनयरक्खिता म्हणाले की, बुद्धांनी शिलाचरण केले पाहिजे, धम्म आचरणात आणला पाहिजे, बौद्धांनी दारू पिऊ नये, बौद्धांनी डी. जे. वर नाचू नये, बौद्धांनी बुद्ध विहारात गेले पाहिजे. सुसंस्कृत समाज घडविण्याची जबाबदारी बौद्ध भिक्षुवर आहे. यासाठी प्रशिक्षित बौद्ध भिक्षु तयार होणे गरजेचे आहे. बुद्ध विहार हे बौद्ध संस्कृतीचे केंद्र बनले पाहिजे.
तीन विषयांवर परिसंवाद व खुले चर्चासत्र
भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय बौद्ध समाज की समस्याए एवंम उपाय या विषयावर आयोजित परिसंवादात दयासागर बौद्ध, मिलिंद बौद्ध, उमेश नागदेवे, डॉ. अरुणा लोखंडे, धम्मचारी सुचिरत्न यांनी सहभाग नोंदविला.
राजेंद्र भालशंकर, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विहार संस्कृती के निर्माण में बुद्ध विहार समन्वय की भूमिका या विषयावर आयोजित परिसंवादात जयाजीराव पाईकराव, डॉ. उल्हास आंबेकर (गोवा), भेरूलाल लामा (राजस्थान), डॉ. प्रतिभा अहिरे, स्मिता खैरनार आदींनी विचार मांडले.
दिपक कामत (जयसिंगपूर) यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श बुद्ध विहार निर्मिती में उनके संचालको की भूमिका या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. यामध्ये व्ही.पी. सिंग (दिल्ली), प्रा. भारत सिरसाट (महाराष्ट्र), डॉ. रंजना वांडकर (गुजरात) महेंद्र बुद्धरत्न, जे. पी. शेजवळ यांनी सहभाग घेतला.
यानंतर भदंत बोधीपालो महस्थवीर यांची धम्मदेसना झाली. पहिल्या दिवसाचा समारोप हा अशोक सरस्वती बौद्ध यांच्या आंबेडकरी कीर्तनाने झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारत सिरसाट यांनी केले, राजानंद सुरडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर डॉ. आनंद भालेराव यांनी आभार मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विजय बचके, किशोर सरोदे, धनराज गोंडाने, भास्कर म्हस्के, सी.पी. पाटील, अनंत भवरे, डी. व्ही. खिल्लारे, रेखा राऊत, राहुल मेश्राम, ऍड. ओमप्रकाश सिरसाट, अमरदीप वानखडे आदींनी परिश्रम घेतले.
बाबासाहेब 1930 पासूनच बुद्धानुयायी -डॉ. आगलावे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 मध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेतली व दिली. परंतु ते 1930 पासूनच बुध्दाकडे वळले होते. बाबासाहेबानी आपल्या घराचे नाव राजगृह ठेवले होते, त्यांच्या ग्रंथालयात बुद्ध मूर्ती ठेवण्यात आलेली होती. तसेच त्यांनी मुक्ती कोण पथे या भाषणात बुद्ध आणि आनंद यांच्या झालेल्या संवादाचा संदर्भ दिला आहे. तसेच 1956 पूर्वीच्या अनेक अशा घटना आहेत ज्या बाबासाहेब बुद्धानुयायी असल्याचे सिद्ध करतात.




No comments:
Post a Comment