नांदेड :
भाजीपाला अत्यावश्यक सुविधेत येत असल्याने दूर-दूर अंतरावर मार्कींग करुन भाजीपाल्यांची दुकाने सुरू ठेवण्यात यावीत. यासाठी त्या-त्या ठिकाणावरील पोलीस विभागामार्फत सुरक्षा व्यवस्थेची मदत घेण्यात यावी. सकाळपासून 24 तास भाजीपाला दुकानावर विक्री करता येईल, परंतु ग्रामीण भागात सकाळी 8 ते 11 या वेळेतच भाजीपाला विक्री करण्यात यावी. यावर तलाठी, ग्रामसेवक यांनी नियंत्रण ठेवावे, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्देश दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या निजी कक्षातून आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. कोलगणे, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील, सहायक आयुक्त अजितपाल संधू, विलास भोसीकर, मिर्झा फरनुला बेग, गुलाम महमंद आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी डॉ. विपीन म्हणाले की, स्वस्त धान्य दुकानदारांना तीन महिन्यांचे अन्न धान्य देण्याचे नियोजन करण्यात यावे. अन्न-धान्याचा अनियमितपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच वार्डनिहाय नियोजन करुन धान्य वाटप करण्यात यावे. गर्दी होणार नाही याचीही दक्षता घेण्यात यावी. तीन फुटाचे अंतरावर नागरिकांना उभे राहण्यासाठी मार्कींग करुन देण्यात यावे. स्वस्त-धान्य दुकानदारांना सॅनिटाझर व मास्क ठेवण्याचे सांगण्यात यावे. वार्डासाठी वेळा ठरवून देण्यात याव्यात. अत्यावश्यक सुविधा असलेली अन्न-धान्य, औषधीची ने-आण करणाऱ्या वाहनांची माहिती जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक यांच्याशी मो. 9423255890या क्रमांकावर संपर्क साधून द्यावी.
किराणा दुकानदारांनी स्वयंसेवी व इच्छूक मुले यांच्यामार्फत घरपोच धान्य देण्यात यावे. दुकानासममोर त्यांनी असा फलक लावावा. किराणा दुकाने 24 तास चालू ठेवता येतील. ग्राहकांची यादी असेल, तर त्यांना फोनद्वारे सामानाची यादी मागवून घेवून त्यांना वेळ ठरवून देऊन सामान घेवून जाण्यास सांगण्यात यावे.
विमानतळ, रेल्वेस्टेशन, बसस्थानक याठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या आरबीसी पथकांनी पुणे-मुंबई येथून आलेल्या व्यक्तींना तपासणी करण्याबाबत समज देण्यात यावी. एम.एस. आणि टीएचओ यांनी याबाबतचे लेखी आदेश काढावेत. कोणतेही जिल्हा व तालुका स्तरावरील मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज येथील वैद्यकीय कर्मचारी, आयुर्वेदिक कॉलेज येथील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात यावी. यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसिलदारांनी कार्यवाही करावी. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लक्ष ठेवावे. खाजगी दवाखाण्यांची बंद करण्यात आलेली ओपीडी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. ओपीडी चालू असल्याचा अहवाल उपविभागीय अधिकारी यांनी लेखी कळवावा. तालुकास्तरावर कोरोंटाईनवार्डसाठी 50 बेड उपलब्ध करण्यात आली होती. परंतु आणखी 50 बेडची उपलब्धता करुन ठेवण्यात यावी.
तालुकास्तरावरील खाजगी दवाखाने व व्हेंटिलेटर उपलब्ध असल्यास दवाखानानिहाय यादी तयार करावी. मास्कची किंमत रुपये दहा, तर सॅनिटाझरची रुपये शंभर अशी आहे. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांना तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा तालुका आरोग्य अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध निधीतून हे साहित्य खरेदी करुन देण्यात यावे, उपलब्ध न झाल्यास जिल्हास्तरावर याबाबत माहिती कळविण्यात यावी.
तालुका स्तरावरील बचत गटामार्फत कापडी मास्क तयार करण्यात यावेत. मास्क दिवसा वापरून संध्याकाळी धुवून परत वापरता येतील. हे पोलीस, महसूल कर्मचारी यांना उपलब्ध करुन देण्यात यावे.
दिवसातून एक वेळेस दुपारी फवारणी करण्यात यावी. स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने आवश्यक मदत घेता येईल त्याची माहिती घ्यावी. मॉलच्या ठिकाणी बाहेर फलक लावण्यात यावा. तसेच त्या ठिकाणी साबण किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ करुनच प्रवेश देण्यात यावा. घरपोच आवश्यक साहित्य देण्यात यावे. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत अंतर्गत रोजंदारांची जेवणाची व्यवस्था स्वंयेवी संस्थेमार्फत करण्यात यावी. स्वयंसेवी संस्था, आमदार, नगरसेवक यांच्या मदतीने गरजू नागरिकांना जेवणाची व्यवस्था करावी.
किराणा दुकानातील कामगारांना जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून ओळखपत्रे देण्यात येतील. यासंदर्भात नोडल अधिकारी म्हणून पी. जी. देशपांडे मो. 9923258261 यांच्याकडे संपर्क साधावा. वैद्यकीय औषधीचा जास्तीचा अनावश्यक साठा ग्राहकांना देण्यात येवू नये. शहरामध्ये स्वच्छता निरीक्षक यांच्यावतीने गरजूंना यांना आयडेंटीफाय (ओळखून) करुन त्यांना अन्न घरपोच देण्यात यावे. सुरक्षिततेसाठी आवश्यकता भासल्यास पोलीस विभागाची मदत घेण्यात यावी.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव दूर करण्यासाठी कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना घरमालकांनी समजून घेण्याची गरज आहे. यासाठी त्यांनी सहकार्य करावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था काही मदत घेवून अन्नदान व इतर मदत करु इच्छिणाऱ्या व्यक्तींना जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना 9822426849 व 02462-235303 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले.
हायपोक्लोराईडची फवारणी सर्व शहरी भागात मनपाने करावी. तर ग्रामीण भागात तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक, रेल्वे स्थानक च अन्य गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी दिले.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर म्हणाले की, भाजीपाला बाजार, किराणा दुकान या ठिकाणी गर्दी न करता आवश्यक अंतर ठेवण्यासाठी महसूल व पोलीस अधिकारी यांनी मदत करावी. तालुकास्तरावर सॅनिटाझर व मास्क यांचा तुटवडा भासत असल्यास औषधी दुकानावर तहसिलदारांनी छापे टाकावेत.
सर्व तालुकास्तरीय अधिकारी तसेच तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयी रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात कामचुकारपणा केला तर आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी निर्देश देण्यात आले.




No comments:
Post a Comment