किनवट :
दक्षिणेकडून उत्तर भारताकडे तेहत्तीस मजूरांचा जत्था कुटूंब काबिल्यासह शिवरस्त्याने पायी जात असल्याची खबर मिळाताच त्यांना ताब्यात घेऊन शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह, गोकुंदा ( पूर्व ) येथे मदत शिबीरात ठेवण्याचे आदेश सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्याने त्यांना 'होमकारोंटाईन ' केले आहे.
हैद्राबादजवळील रामोजी फिल्मसिटी परिसरात संगारेड्डी जिल्ह्यात कामानिमित्त आलेले स्थलांतरीत मजूर राहात होते. व्यापैकी काहीजन आईस्क्रिम विकायचे तर काहीजन ठेकेदाराच्या अधिनस्त काम करायचे. कोरोना ( कोव्हीड-१९ ) प्रादुर्भावाने झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचं काम थांबलं. जवळच राशन पाणी संपलं. ठेकेदार वा सरकार कामाला जाऊ देईना, अन् जेऊ देईना. तेथे उपाशी मरण्यापेक्षा ते आपल्या बाड -बिस्तऱ्यासह ते आपल्या लेकरा-बाळासह रविवारी (ता. २९ ) पायी निघाले. रस्त्याने गावकऱ्यांकडून मिळेल ते खात-पित, मजल- दरमजल करत ते पुढं निघाले. तेलंगाणात त्यांना कुठच अडविलं नाही उलट सोनाळ्याजवळील महामार्गाच्या चार किमी अंतरावर पोलिसांनी त्यांना बोलेरे पिकअपमध्ये बसवून महाराष्ट्राच्या सीमेवर घनपूर नाक्याच्या काही अंतरावर सोडले. मुख्य रस्त्याने न जात डोंगराच्या, शेताच्या आडमार्गाने जा अन्यथा नाक्यावरील पोलिस तुम्हाला ताब्यात घेतील असा सल्लाही त्यांनी दिला.
ते असेच मुख्य रस्ता सोडून कोठारी ( चि) गावाजवळ आले. सकाळीच ग्रामस्थांनी त्यांना जेवन दिले. त्यानंतर एमआयडीसी, आयटीआय मागील रस्त्याने ते आनंदवाडी परिसरातून दत्तनगरमार्गे नागपूरकडे जाणार होते. गुरुवारी ( ता. दोन ) सकाळी ११ वाजता पुरी यांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अभिनव गोयल यांना खबर देताच त्यांनी तहसीलदार नरेंद्र देशमुख व पोलिस निरिक्षक मारोती थोरात यांना ' त्या स्थलांतरीत मजूरांना ' ताब्यात घेऊन शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह, गोकुंदा ( पूर्व ) येथे ठेवण्याचे सूचित केले. तिथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. गजानन काळे यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्या सर्वांच्या हातावर 'होम कोरोंटाईनचा ' शिक्का मारला. गृहपाल एन.एम. पवार यांच्या ताब्यात त्यांना दिले. तिथे महसूल विभागाचे अधिकारी नियुक्त करण्यात आले असून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्या तेहत्तीस मजूरात मध्य प्रदेशचे एकेवीस, बिहारचे सात, उत्तर प्रदेशचे तीन व राजस्थानच्या दोघांचा समावेश आहे. पुरूष : २३, महिला: ६ व मुलं : ४
" केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करून महाराष्ट्र पोलिस नाक्यावर स्थलांतरीत मजूर दिसताच त्यांना ताब्यात घेत आहेत. राज्यातील विविध मदत शिबीरात तेलंगाणा व आंध्रप्रदेशातूनच उत्तर भारताकडे जाणारांची संख्या सर्वाधिक आहे. तेलंगाणा पोलिसांनी चहा-नाष्टा देऊन आम्हाला महाराष्ट्र सिमेत सोडलं हे किनवटमधील शिबीरार्थी सांगत आहेत. वरिष्ठ स्तरावरून बोलून तेलंगाणातून येणारा लोंढा थांबलाच पाहिजे. -प्रशांत वाठोरे, सामाजिक कार्यकर्ते





No comments:
Post a Comment