किनवट :
शेतकऱ्यांच्या शेतमालास आधारभुत किंमत मिळावी यासाठी कडधान्य खरेदी केंद्रांना मुदतवाढ देवून खरेदी केंद्र सुरू ठेवण्यास परवानगी देण्याची मागणी आमदार भीमराव केराम यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांना दिलेल्या लेखी निवेदनात आ. केराम यांनी म्हटले आहे की, किनवट व माहूर तालुक्यात आधारभुत किमतीच्या धर्तीवर आदिवासी विकास महामंडळातर्फे कडधान्य खरेदी केंद्र सुरू असून यावर चना व तुर खरेदी सुरू आहे. तथापि किनवट व माहूर हे दोन्ही तालुके डोंगराळ भाग असल्याने या तालुक्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू, ज्वारी, मक्का आदी पिकांची पेरणी भरमसाठ प्रमाणात केली असून चालू वर्षात अंदाजे २० टनापेक्षाही जास्त मक्क्याचे उत्पन्न असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
परंतू सद्यपरिस्थितीत 'कोरोना' विषाणूच्या पार्श्वभुमिवर लॉकडाऊन असल्याने सुरू असलेल्य खरेदी केंद्रांवर बहुतांश शेतक-यांचा शेतमाल अद्यापही पोहोचू शकला नाही. त्यातच पिकवलेल्या शेतमालाला हमीभाव नसल्याने शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उत्पादीत मालास हमीभाव मिळणेसाठी तालुक्यातील सर्व खरेदी केंद्रांवर मक्का व मालदांडी ज्वारी खरेदी करण्यास मुदतवाढ देवून खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आ. केराम यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.




No comments:
Post a Comment