शिवणी ता. किनवट (प्रकाश कारलेवाड ) : मागील चार ते पाच दिवसापासून सकाळी सहा ते अकारा वाजेपर्यंत सतत पावसाचा जोर चालू होताच परंतु बुधवारी (दि.२२ जुलै ) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक आभाळ भरून आलेले, गावाकडून जंगलाकडे पहावे तर ढग फुटी सारखेच दिसले. पाहता पाहता थोड्याच वेळात पावसाने असा जोर धरला की, तासभर थांबायचं नावच घेईना. ७० मिली मीटर पावसाची नोंद झाली असून अनेकांच्या घरादारात घुसून दाणादाण केली आहे. गावातील मुख्य रस्त्यासह सर्वत्र तीन तास पाणी वाहत होते. शिवणी परिसरात हजारो हेक्टर शेतं तळं साचल्यासारखे दिसू लागले.
शिवणी गावात व आबादि आणि बसस्टँड परिसरात पाणीच पाणी झाले होते. यात सुभाष पुंजरवाड यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील अन्य-धान्य, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू, अंथरण-पांघरूण व वापरायचे सर्वांचे कपडे खराब झाले आहेत. जवळपास दोन तास पाऊसाने तडाका लावल्याने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. मृगापासून तर मागील आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस पडल्याने शेतातील पिके चांगल्या प्रकारे डोलु लागली होती. परंतु आजच्या ताडाख्याच्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. अनेक घरात पाणी शिरले आहे. या वर्षीच्या पावसाळ्यातील ( आजपर्यंतचा ) हा सर्वात मोठा पाऊस म्हटलं तरी वावगे ठरणार नाही.
गावातील मुख्य रस्ता असलेल्या राज्य महामार्गावरून दोन ते तीन तास पाणी वाहत होते. शिवणीच्या मुख्य मार्केटमध्ये पाणी भरल्याने अनेक व्यापाऱ्यांची फार मोठी अडचण झाली आहे. जवळ पास एक तास पावसाने झोडपल्याने ७० मी.मी. पावसाची नोंद झाली असून या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावलागत असलेल्या सर्व नद्या -नाल्यांना पूर आल्याने मुख्य मार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. दिवसभर रानावनात चरून सायंकाळी घरी येणाऱ्या गुरं -ढोरांची मात्र तारांबळ ऊडाली आहे. अनेक जागी विद्युत खांबही उन्मळून, मोडून पडले आहेत




No comments:
Post a Comment