मुंबई : राज्यातील लॅबची संख्या दोन वरून 131 पर्यंत प्रत्येक गावामध्ये कोरोना दक्षता समितीची स्थापना करणार प्रत्येक लॅबमध्ये संशोधनासाठी स्वतंत्र विभाग निर्माण करावा. कोरोनावर मात करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना विषाणूच्या संकटाने सर्व जग ग्रासले असून या विषाणूची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात 131 प्रयोग शाळा उभारण्यात आल्या आहेत. राज्यातील जनतेला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून या माध्यामातून महाराष्ट्र हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोच्च व सर्वोत्तम आरोग्य सुविधा असणारे राज्य घडविण्याचे स्वप्न असून ते मी घडविणारच असा ठाम निर्धार व विश्वास राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उस्मानाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र परीसरात उभारण्यात आलेल्या उस्मानाबाद कोविड-19 तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, ही प्रयोग शाळा उभारणीसाठी ज्यांचे-ज्यांचे हात लाभले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच कोविड सारखी संकटे येतात आणि जातात संकटात जो पाय रोवून उभे राहतो व पुढे वाटचाल करतो तेच खरे या संकटावर मात करतात. संपूर्ण जग संकटग्रस्त झाले आहे. या संकटात तुम्ही सर्वजण पाय रोवून उभे राहिलात त्यामुळे तुमचे मन:पूर्वक धन्यवाद देतो असे सांगुन ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात आवश्यकता असेल तेथे प्रयोगशाळा सुरू करीत आहोत.
कोरोना हा पहिला वायरस नसून यापूर्वी एचआयव्ही, स्वाईन फ्ल्यू यासह इतर वायरस होते. त्यावेळी कोरोनाने डोळे उघडले. यापूर्वी आपण वेळ मारून नेली त्यामूळे आपल्याला यावर विजय मिळविला असे वाटले त्याचवेळी कोरोनाची चाहूल ओळखु शकलो असतो तर लस संशोधनासाठी प्रयत्न केले असते त्यामुळे, यापुढे सतत संशोधन होत राहिले पाहिजे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुचित केले.
तसेच हा काळ गेल्यानंतर प्रत्येक प्रयोग शाळेत एक विभाग संशोधनासाठी सुरु ठेवला पाहिजे. कोरोनाने जगायचे कसे हे शिकविले असून प्रत्येकाने स्वत: व कुटुंबातील सदस्याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमण्याबरोबरच प्रत्येक गावात कोरोना दक्षता समित्या नेमण्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचित केले. विशेष म्हणजे आपण कितीही प्रयोगशाळा उघडल्या तरी ते पुरे पडणार नाही त्यामुळे जनतेला सोबत घेऊन व त्यांच्यात जनजागृती करून संबंधित नियम कठोरपणे व कटाक्षाने पाळावे लागतील असे त्यांनी नमूद केले. प्रत्येकाने यापुढील काळात स्वयंशिस्त पाळली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
हा काळ कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा असल्याने कोणीही गाफील न राहता आवश्यक ती काळजी घ्यावी कारण जोपर्यंत आपल्याकडे व्हॅक्सीन (औषध) आपल्या हाताशी येत नाही तोपर्यंत आपण विजय मिळवू शकत नसल्याने जनतेला सोबत घेवून आपल्याला पुढे जायचे आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी आरेाग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, प्रयोगशाळा सुरू असेल तर त्यामध्ये ज्या उणीवा असतील त्या दुर करणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग पुर्णता प्रशिक्षितच असायला हवा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांना दिल्या. तसेच सर्वानी मिळून काम केल्यास या प्रयोगशाळेचे उद्दिष्ठ पुर्ण होणार असून आयएमएच्या डॉक्टरांची सेवा घेणे गरजेचे आहे. कारण जिल्ह्यातील मुत्यू दर वाढत असल्यामुळे आवश्यक ती पावले उचलावीत विशेष म्हणजे यापूर्वी तपासणीसाठी इतर जिल्ह्यावर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आता ही प्रयोगशाळा सर्व प्रकारच्या तपासणीसाठी उपयुक्त असल्याने जिल्हा स्वावलंबी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री शंकरराव गडाख म्हणाले, ही प्रयोगशाळा सुरू होण्यास विलंब झाला असला तरी येथील लोकप्रतिनिधी व जनतेची मागणी पूर्ण झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये या प्रयोगशाळेचा जिल्हयासाठी नक्कीच फायदा होणार असल्याचे नमूद केले तर कुलगुरू डॉ.प्रमोद येवले म्हणाले की,प्रयोगशाळाही दुसरी तपासणी शाळा असून मागील महिन्यात या विद्यापीठात 1 हजार 700 नमुने तपासणी ची क्षमता असलेली प्रयोग शाळा औरंगाबादमध्ये सुरू केली आहे. हे देशातील पहिले विद्यापीठ ठरले असून उद्योजकाकडून त्यासाठी निधी उभा राहीला आहे. येथील प्रयोग शाळे संदर्भात विद्यापीठ सिनेंट सदस्य प्रस्ताव सादर केला व लॉकडाऊनच्या काळात हे कार्य सर्वांच्या सहकार्यांने पार पडले, विषाणू बाबत औरंगाबाद येथे संशोधन सुरू केले असून कोरोना सोबत भविष्यात तोंड देण्यासाठी जैविक विभाग स्थापन करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी या प्रयोगशाळा उद्घाटनाचे प्रस्ताविक केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद अंतर्गत covid-19 तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या आव्हानाला जिल्ह्यातील दानशूर व्यक्तींनी प्रतिसाद देऊन सुमारे 71 लाखाचा निधी प्रशासनाकडे जमा केला अशी माहिती त्यांनी दिली तसेच या प्रयोगशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणावर तपासण्या करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सर्व देणगीदार साखर कारखाना,सहकारी बॅक, पतसंस्था व कंपनी व्यवस्थापनाचे चेअरमन, प्रतिनिधी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी मानले.
यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख, जिल्हा परिषदच्या अध्यक्षा प्रा.अस्मिता कांबळे, खासदार ओमप्रकाश राजे निबांळकर, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, जि.प.उपाध्यक्ष धनजंय सावंत, नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्हि वडगावे, कोवीड जिल्हा नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रयोगशाळेसाठी सहकार्य केलेल्या देणगीदारांची यादी
उस्मानाबाद जनता सहकारी बँक, जिल्हा सहकारी पतसंस्था, फेडरेशन नॅचरल शुगर, धाराशिव शुगर, भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँक, गोकुळ शुगर, भाई उद्धवराव पाटील सहकारी पत संस्था, बालाजी अमाईन्स , डी मार्ट ,रिन्यू एनर्जी , श्री विठ्ठल साई सहकारी साखर कारखाना, उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्था, उस्मानाबाद जिल्हा पाटबंधारे, कर्मचारी सहकारी पतसंस्था , शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी पतसंस्था, एन साई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, तामलवाडी इंडस्ट्रियल असोसिएशन, रुपामाता अग्रोटेक व इतर जिल्ह्यातील पतसंस्था सहकारी संस्था व छोट्या-मोठ्या आस्थापनांनी मदत केली.




No comments:
Post a Comment