मुंबई (आशा रणखांबे) : मुंबई विद्यापीठातील मानव्यविद्या शाखा आणि लोककला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित काव्यवाचन आणि शाहिरी जलसाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या संयुक्त कार्यक्रमासाठी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रोफेसर डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी प्र. कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा उजाळा दिला. आपल्या आजूबाजूच्या प्रश्नांवर चिंतन करण्याच्या हेतूने अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य लेखन केले. अण्णाभाऊ साठे यांच्यामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले. 'पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती कामगारांच्या व दलितांच्या तळहातावर तरली आहे' या अण्णाभाऊ साठे यांच्या एका वाक्याने जागतिक पातळीवरील दलित व कामगारांचे महत्त्व पुढे आले असे स्पष्ट करून लवकरच मुंबई विद्यापीठात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अध्यासन कार्यान्वित करण्याचे प्रयत्न चालू असल्याचेही डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
या प्रसंगी मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.राजेश खरात यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. मुंबई विद्यापीठाने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अण्णाभाऊंना कृतिशील अभिवादन केले असे प्रतिपादन डॉ. राजेश खरात यांनी याप्रसंगी केले. या उद्घाटन सत्राचे सुत्रसंचालन डाॅ. प्रकाश मसराम यांनी केले व प्रास्ताविक आयोजन समितीचे समन्वयक प्रा. अनिल बनकर यांनी केले.
दरम्यान अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या कविसंमेलनात राज्यभरातील निमंत्रित कवींनी सहभाग घेतला. प्रा. हर्षल शाक्य (सोलापुर), डॉ. मारोती कसाब (उदगीर), प्रा.अवकाश जाधव (मुंबई), प्रा. दीक्षा कदम (पुणे), डॉ. संतोष राठोड ( मुंबई), प्रा. बाबासाहेब कांबळे (मुंबई), प्रा. सुचिता गायकवाड (कणकवली), जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे (सांगली), अँड प्रज्ञेश सोनावणे (ठाणे) या कवींनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन व कार्यावरील तसेच अन्य सामाजिक प्रबोधनपर कविता सादर करून सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. तसेच डाॅ. विजय मोरे यांनी कवी नितीन चंदनशिवे यांच्या तमाशा या कवितेचे वाचन केले. या कविसंमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन करीत ज्येष्ठ कवी डॉ. मंगेश बनसोड यांनी रंगत आणली.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रात शाहिरी जलशाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. लोककला अकादमीचे विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे तसेच प्रसिद्ध शाहीर प्रसाद विभुते व त्यांच्या संचाने अतिशय दमदार अशा पद्धतीने शाहिरीचा कार्यक्रम सादर केला. याप्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मुंबई, जग बदल घालुनी घाव, माझी मैना गावावर राहिली या शाहिरीने सर्वांनाच मोहित केले.
या कविसंमेलन व शाहिरी जलशाच्या कार्यक्रमावर डाॅ.अनिल सकपाळ , प्राचार्य डाॅ.लहुपचांग व प्राचार्या डाॅ.स्वप्ना समेळ यांनी आपले निरिक्षणात्मक मत मांडले .
या काव्य वाचन व शाहिरी जलशाच्या कार्यक्रमासाठी समन्वयक प्रा. अनिल बनकर, लोककला अकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे, संयोजक डॉ. विजय मोरे, सहसंयोजक डॉ. सोमनाथ कदम, कणकवली तसेच संयोजन समितीतील सदस्य, कर्मचारीवर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे शेवटी डॉ. सोमनाथ कदम यांनी आभार मानले. या काव्य वाचनाचा व शाहिरीचा लाभ शेकडो दर्शकांनी घेतला. सदर कार्यक्रम हा झूम अँप व यु ट्यूब वर ऑनलाईन घेण्यात आला.
No comments:
Post a Comment