किनवट : आदिवासीबहुल बुधवारपेठ गावाचा पंचायत क्षेत्र विस्तार कायद्यात (पेसा) समावेश करावा या मागणीसाठी मागील चार वर्षापासून शासन प्रशासनाकडे निवेदने, विनंतीअर्ज करून सुद्धा न्याय मिळत नसल्याने शासन प्रशासनाच्या या टाळाटाळ धोरणाला वैतागून बुधवारपेठचे सरपंच ज्ञानदेव नागोराव पुरके यांनी आपल्या प्रभारी सरपंच पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे लेखी स्वरूपात सादर केला आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले आहे की किनवट तालुक्यातील मौजे बुधवारपेठ गावाची एकूण लोकसंख्या 582 असून त्यापैकी अनुसूचित जमाती आदिवासी गोंड जातीची संख्या 562 ईतकी आहे. तसेच हे गाव स्वतंत्र महसुली गाव असून या गावाचा आदिवासी उपयोजनेत समावेश आहे, मात्र पंचायत क्षेत्र विस्तार (पैसा ) योजनेपासून बुधवारपेठ गाव वंचित राहिले आहे. अतिशय मागास, दुर्गम, आदिवासी व अविकसित असलेल्या बुधवारपेठ गावाचा पेसा योजनेत समावेश होऊन गावाचा सर्वांगीण विकास घडावा या हेतूने गावचा सरपंच या नात्याने गेल्या चार वर्षांपासून ज्ञानदेव पुरके हे शासन प्रशासनाकडे लेखी निवेदने सादर करून पाठपुरावा करत आहेत. 4 वर्षाच्या कालावधीत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्यासह आदिवासी विकास विभाग, ग्राम विकास मंत्रालयापर्यंत शेकडो निवेदने सादर केली. त्याचबरोबर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांना सोबत घेऊन अनेक वेळा आमरण उपोषणे केली. इतकेच नव्हे तर शेवटी महामहीम राष्ट्रपती यांनासुद्धा लेखी निवेदन सादर करून बुधवारपेठ गावाचा पेसा योजनेत समाविष्ट करण्याची विनंती केली, मात्र न्याय मिळाला नाही. बुधवारपेठ गावाचा पेसा योजनेत समावेश नसल्यामुळे येथील नागरिक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत. केवळ पेसा योजनेअभावी मी सरपंच असून सुद्धा गावाचा विकास करू शकत नाही याची मला खंत वाटत आहे. असे नमूद केले आहे. शासन प्रशासनाने माझ्या विनंती अर्जाची दखल घेऊन बुधवारपेठ गावचा पेसात समावेश केला असता तर गत 4 वर्षाच्या काळात सरपंच या नात्याने मी गावाचा कायापालट केला असता. शंभर टक्के आदिवासी गाव असतानासुद्धा शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बुधवारपेठ गाव पेसा योजनेपासून वंचित राहिले आहे. मी चार वर्षापासून सतत पाठपुरावा करून वैतागलो असून या योजनेच्या बाबतीत माझ्या गावाला न्याय मिळणे दुरापास्त झाले आहे. म्हणून माझे सरपंचपद निरर्थक व कुचकामी असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे शासन व प्रशासनाच्या या टाळाटाळ व दुर्लक्षित धोरणामुळे मी माझ्या सरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचे सरपंच ज्ञानदेव नागोराव पुरके यांनी म्हटले आहे.
बुधवारपेठ हे गाव अतिशय मागास असून शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ज्या ठिकाणी एक-दोन परिवार आदिवासींचे आहेत अशी गावे पेसा योजनेत समाविष्ट आहेत. मात्र बुधवारपेठ गाव पेसा पासून कसे वंचित राहिले ? का जाणून बुजून वंचित ठेवले ? हा खरा प्रश्न आहे. तालुक्यातील बुधवारपेठ नव्हे तर बहुतांश आदिवासी वाडी व खेड्यांचा पेसात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे आदिवासी समाज शासनाच्या सर्वच सोयीसुविधा पासून वंचित आहे. पेसाअभावी आदिवासी गावातील तरुणवर्ग नोकरीपासून मुकला आहे. शासन प्रशासनाचा हा आदिवासी समाजावरील अन्याय आहे. सरपंच पुरके यांची मागणी योग्य असून त्यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पुरके यांची मागणी त्वरित मान्य झाली नाही तर किनवट तालुक्यातील आम्ही सर्व आदिवासी सरपंच सामूहिक राजीनामे देऊ.-विकास कूडमते,विद्यार्थी नेते




No comments:
Post a Comment