लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती ते महाकवी वामनदादा कर्डक जयंती १ ते १५ ऑगष्ट या कालावधीत क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या विशेष उपक्रमात महेंद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीत कवी, गायक व शाहिरांचे योगदान... ' ही लेखमाला देत आहोत. भाग - ८,
- संपादक
शाहीर बळीराम मामजी हनवते यांचा जन्म १ आगष्ट १९४२ रोजी नांदेड जिल्ह्यातील तालुका हिमायतनगर येथे झाला. अत्यंत गरीबीची परिस्थिती होती. माध्यमिक शिक्षण आत्याने केले, तर महाविद्यालयीन शिक्षण बी. ए. पर्यंत नागनाथराव व प्राचार्या ताराबाई परांजपे यांनी केले.
लहानपणापासून बळीराम हनवते यांना भजन गाण्याचा व भाषण करण्याचा छंद होता. पेटीमास्तर रामभाऊ हनवते व तबलामास्तर बाबाराव हनवते यांनी गीत गायन शिकवीले. तेथुनच खरी सुरुवात झाली. डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी धम्म दिक्षा सोहळे झाले . असाच एक धम्म दिक्षा सोहळा हिमायतनगरला १९५८ साली आयु. मुकुंदराव आनंदराव आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला. बळीराम हनवते यांनी त्या धम्म दिक्षा सोहळ्यात स्वयंसेवक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्या कार्यक्रमात कवी गायकांनी गाणी गायली. ती गाणी ऐकुन त्यांच्या सारखाच कवी गायक व्हावे असे त्यांना वाटले.
शाहीर बळीराम हनवते यांना ग्रामसेवकाची नोकरी लागली होती. पण त्या नौकरीमध्ये ते रमले नाहीत. त्यांनी ती नौकरी सोडली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या कार्यात स्वत:ला वाहुन घेतले. तेंव्हापासुन खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन गीतं गात असत. नवनवीन गीतं लिहीत व भजन पार्टीत गाणं गात प्रबोधन करीत. आजही निस्वार्थीपणे करतात. आज त्यांना ७८ वर्षे झालीत. शरीरानं थकले परंतु मनाने अजुनही तरुण आहेत. आजुनही त्यांची लेखणी थांबली नाही. गीतं लिहुन ते उत्साहाने सादर करतात. संपुर्ण महाराष्ट्र, आंध्रप्रदेशात त्यांचे शेकडो कार्यक्रम झाले. आंध्रप्रदेशात जाऊन गाय न शिकवण्याचे मास्तर म्हणुन काम केले. लोककवी वामनदादा कर्डक यांची व स्वरचित गाणी ते गातात. गावोगावीच्या भजनी मंडळातील गायकांनीही शाहीर हनवते यांची गीते गायली आहेत.
आदिलाबाद येथे वामनदादा कर्डक जयंती निमित्त कवीसम्मेलनात त्यांची व माझी भेट झाली. प्रसिद्ध विचारवंत व गझलकार मधु बावलकर यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. किनवट येथुन मी, प्रा.रामप्रसाद तौर, प्रा. किशनराव किनवटकर, प्रा. डॉ. अबादास कांबळे, वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील सोबत होते. त्या कार्यक्रमात आम्ही आमच्या कविता सादर केल्या. त्यानंतर शाहीर बळीराम हनवते यांनी हातात पेटी घेऊन अगदी उत्साहाने गीत गायले.
प्रकाशित गीत संग्रह-
त्यांचा भावगंध नावाचा पहिला काव्यसंग्रह प्राचार्य अशोक नवसागरे सरांनी प्रकाशित केला. त्यानंतर भावगंधचे सात भाग काव्यसंग्रह प्रकाशित झाले. निळी मशाल नावाची सि.डी.कँसेट प्रताप लोकडे चिकणेकर यांच्या सहकार्याने काढली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने पाऊलवाट हा १२७ गीतांचा काव्यसंग्रह आनेकांच्या सहकार्यातुन प्रसिद्ध केला.
मनपसंत गीते-
१)पिता रामजी माता भिमाई
जन्मला भीम पोटी,
त्या भीमाला हे वंदन कोटी कोटी.
२)ह्या पाऊलवाटेने चला,
बुद्ध गौतमाच्या पाऊलाने.
३)चित केले हे पंडित सारे,
भीम करी हैरान.
४)गौतमाच्या थोर पुत्रा राहुलला,
वंदीतो मी बौद्ध भिक्षु राहुला.
५)जयंती भीमाची छान गं,
जन्मला भीम गोरापान गं.
सत्कार-
शाहीर बळीराम हनवते यांच्या प्रबोधन कार्यामुळे त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार झाले. भोकर येथे आयु.एल.ए.हिरे यांनी आयोजित कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुस-या पत्नी माईसाहेब भीमराव आंबेडकर यांच्याहस्ते सत्कार झाला. त्यावेळी रिपाईंचे नेते रामदास आठवले यांची उपस्थिती होती. आदरनिय बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्टेजवर अनेक वेळा त्यांचे कार्यक्रम झाले. तेथेही त्यांचा सन्मान झाला. भारतीय बौद्ध महासभेचे महाराष्ट्र राज्याचे तत्कालिन अध्यक्ष प्रा. सत्यजित चिखलीकर यांच्या हस्ते हदगाव येथे सत्कार, दाभड येथील पहिल्या धम्म परिषदेत डॉ.एस.पी.गायकवाड यांच्याहस्ते, तसेच साहित्यिक मा.म.देशमुख यांच्या हस्ते गौरव झाला, किनवट येथील धम्म परिषदेत शाहीर वामनदादा कर्डक प्रबोधनरत्न पुरस्कार मिळाला.
सहवास-
लोककवी वामनदादा कर्डक यांचा त्यांना भरपुर सहवास लाभला. तसेच शाहीर जंगम स्वामी यांचा ही सहवास लाभला.
शाहीर बळीराम हनवते यांचे प्रबोधन चळवळीतील योगदान अतिशय मोलाचे आहे. अशा निस्वार्थी शाहीराला मानाचा मुजरा !
जयभीम.
-आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट जि.नांदेड.
मो.न.९४२२७६८६५०.





No comments:
Post a Comment