नांदेड (मिलिंद व्यवहारे ) दि.11 : गावस्तरावर स्वच्छतेसाठी गंदगीमुक्त भारत अभियानाला सुरुवात झाली असून जिल्हयातील सर्व गावे या अभियानात सहभागी झाली आहेत. दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत स्वच्छतेविषयी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संपूर्ण देशभर गंदगीमुक्त भारत अभियान राबविण्यात यावा असे निर्देश केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने दिले आहेत. जिल्हयात या अभियानांतर्गत लोकांमध्ये कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता बाबत स्वभाव परिवर्तन करण्याच्या उद्देशाने हा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या अभियानात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. दिनांक 8 ऑगस्ट रोजी या अभियानाला सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत गावस्तरावर सिंगल युज प्लास्टीकचे संकलन व वर्गीकरण करणे. ग्रामपंचायत स्तरावर, शासकीय इमारतींची स्वच्छता, श्रमदान व रंगरंगोटी तसेच गावस्तरावरील स्वच्छाग्रहींमार्फत हागणदारीमुक्त टप्पा दोन बाबत रॅपिड प्रो प्रणालीच्या फ्री नंबर 18001800404 वरुन गावस्तरावरील स्वच्छता विषयक प्रतिसाद नोंदविले जाणार आहेत. वॉलपेंटींगव्दारे स्वच्छ भारत मिशन संदेश रंगविणे, आज दिनांक 12 ऑगस्ट रोजी श्रमदानाव्दारे गावस्तरावर वृक्षारोपन, दिनांक 13 ऑगस्ट रोजी इयत्ता 6 वी ते 8 वीसाठी गंदगीमुक्त मेरा गांव या विषयावर ऑनलाईन पेंटींग स्पर्धा घेतली जाईल. दिनांक 14 ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व गावामध्ये स्वच्छता व फवारणीव्दारे सॅनिटायझेशन करणे तर दिनांक 15 ऑगस्ट रोजी ग्रामसभेत किंवा ग्रामपंचायत सभेत गावाच्या हागणदारीमुक्त टप्पा दोनची घोषणा करणे असे उपक्रम या सप्ताहात राबविले जाणार आहेत.
तरी दिनांक 15 ऑगस्ट पर्यंत गावस्तरावर गंदगीमुक्त भारत अभियानात विविध उपक्रम राबवून हे अभियान यशस्वी करावे. तसेच कोविड-19 चा प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने स्थानिक गरजा व सोशल डिस्टंन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा उपक्रम राबवावा असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप इंगोले यांनी केले आहे.







No comments:
Post a Comment