लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी जयंती ते महाकवी वामनदादा कर्डक जयंती १ ते १५ ऑगष्ट या कालावधीत क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या विशेष उपक्रमात महेंद्र नरवाडे लिखित 'प्रबोधन चळवळीत कवी, गायक व शाहिरांचे योगदान... ' ही लेखमाला देत आहोत.
(भाग - १४ ),
-संपादक
गायिका आम्रपाली प्रदीप कांबळे (वाठोरे) यांचा जन्म २५ जुलै १९७५ रोजी किनवट येथे झाला. त्यांनी संगीतातील संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली. प्रा.सुभाष पाटील यांच्या कडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तेच त्यांचे संगीत साधनेतील गुरु .
आम्रपाली ह्यांना लहानपणापासूनच गीतगायनाची आवड होती.ही गायन कलेची देणगी त्यांना आई बायजाबाई शंकर वाठोरे यांच्याकडून मिळाली. त्यांची बहीण भारती ताई यांचा पण आवाज छान आहे. ऐ मेरे वतन के लोगो हे गीत ती असं गायची. या गीताच्या मूळ गायिकेने जर तिचं गाणं ऐकलं असतं तर नक्कीच त्याही हबकून गेल्या असत्या. पण मुलीने गाऊ नये म्हणुन तिला गायनासाठी जाऊ दिले नाही.भारती ताईच्या लग्नानंतर तिने आई-वडिलांना ठणकावून सांगितले की हिला तरी बंधन घालु नका.तेव्हापासुन बंधन संपले.
कॉस्मापॉलीटन शाळेत शिकत असतांना कवीता चालीवर म्हणायला जमायचे त्यामुळे त्यांच्या शिक्षिका चौदंते बाई, तोळेकर बाई, चिन्नावार बाई व बामणीकर सर यांनी खुप प्रोत्साहन दिले. वर्गात सर्व मुलांसमोर कवीता म्हणायला लावत .तिथुनच त्यांच्या गायन कलेचा प्रवास सुरू झाला. इयत्ता १० वी मध्ये शिकत असतांनाच किनवट येथे स्वर्गीय मुकेश व स्वर्गीय म.रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गीतगायण स्पर्धा होती त्या कार्यक्रमात त्यांनी गीत गायले आणि प्रथम क्रमांक पटकावला. पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना प्रा.रामप्रसाद तौर सर व प्रा. डॉ.सुनिल व्यवहारे सर यांच्यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे जाण्याचा योग आला. स्वा.रा.ति.मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे विद्यापीठ पातळीवर घेण्यात आलेल्या गायन स्पर्धेत दुसरा क्रमांक, महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे द्वारा पुरस्कृत जिल्हास्तरावरील युवा महोत्सवातील शास्त्रीय गायन स्पर्धेत द्वितीय विशेष प्राविण्य पटकावले.
विशेष म्हणजे आम्रपाली कांबळे यांनी साक्षरता अभियानात रात्रीच्या शाळेत महिलांचे वर्ग चालविले. महाविद्यालयीन शिक्षण घेतांना एड्स जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन,बेटी बचाव,बेटी पढाव,स्वच्छता अभियान यातही भाग घेतला.किनवट येथील शासकीय कार्यक्रमातही अनेक वेळा देशभक्ती पर गीतं सुरेल आवाजात गायली आहेत.
गायिका आम्रपाली प्रदीप कांबळे यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्या विचाराप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी प्रबोधन चळवळीत स्वत:ला झोकुन दिले. या गायनकलेचा व संगीतातील ज्ञानाचा समाजाच्या उत्थानासाठी, जनजागृतीसाठी निश्र्चितच फायदा होईल याची खात्री पटल्यामुळे तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,माता रमाई,भीमाई यांच्या विचारांची शिदोरी सोबत घेऊन प्रचार व प्रसार करण्यासाठी त्या विविध कार्यक्रमात गीत गाय न करतात.
किनवट येथील बौद्ध धम्म परिषदेत आम्रपाली कांबळे यांनी महापुरुषांचे तत्वज्ञान सांगणारी,मानवमुक्तीची वामनदादा कर्डक यांची सदाबहार गीते सादर केली. सामुहिक बौद्ध मंगल विवाह संस्कार विधी संगीतमय पद्धतीने सादर केला. शिवजयंती, जिजाऊ जन्मोत्सवामध्ये सहभाग घेऊन समाजातील रुढी परंपरा दुर करण्यासाठी गीतगायनातुन प्रबोधन केले. बौद्ध धम्म सेवासंघ आयोजित २०१२व२०१३मध्ये राष्ट्रीय महिला परिषदेत सहभाग घेतला.नांदेड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित लाँर्ड बुद्धा टि.व्हि.वर "आवाज भीमाचा" याआँडिशन शो मध्ये स्पर्धेत गीत गायले असता पहिल्याच वेळेस निवड झाली.संगीतातील या ज्ञानाचा गायिका आम्रपाली कांबळे यांनी विद्यार्थ्यांना संगीत शिकविण्यासाठी उपयोग केला.शिशुवाटीका, शांती निकेतन व इरा इंटरनँशनल अशा इंग्रजी शाळेत विद्यार्थ्यांना संगीत शिकविले.
सध्या रेणुकादेवी स्वरताल संगीत विद्यालय किनवट येथे त्या संगीत शिकवितात. सौ.भंडारवार, सौ.सदावर्ते या शिक्षिका, प्रा.घोडवाडीकर,प्रा.दिवे या प्राध्यापिका अशा अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना संगीताचे शिक्षण देऊन संगीत विशारद केले. या संगीतातील ज्ञानदानाबरोबर जयंती,धम्म परिषद, मेळावे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त "गाणे निळ्या नभाचे''या अभिवादन पर गीताच्या कार्यक्रमात व विद्यानगर गोकुंदा येथील तक्षशिला बुद्ध विहारात ही अनेक वेळा गीत गायन केले.
मनपसंत गीते-
१) अमृतवाणी $$ ही बुद्धाची ,ऐका देऊनी ध्यान.
२)भीमरावानी देशावरती प्रेम अलौकिक केले.
३)कबीरा कहें $$ये जग अंधा.
४)ज्ञानसूर्य तु इस जगत का भीमराव महान.
५)धनी माझं मौल्यवानं, पिवळ्या सोन्याहुनं.
अशा प्रकारची एकापेक्षा एक सरस प्रबोधनपर गीतं गाऊन गायिका आम्रपाली प्रदीप कांबळे यांनी आपल्या मधुर गोड आवाजामुळे संगीत क्षेत्रात स्वत:चं यशस्वी गायिका म्हणून स्थान निर्माण केले आहे. समाजाने बुद्ध, कबीर, फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करुन जीवनाचे सार्थक करावे व बांधवांनी समाज घडविण्यासाठी कार्य करावे असा संदेश त्या देतात.त्यांच्या संगीत साधनेच्या पुढील प्रगतीशील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.धन्यवाद.
-आयु.महेंद्र नरवाडे,
किनवट जि.नांदेड.
मो.न.९४२१७६८६५०.





No comments:
Post a Comment