किनवट : गोकुंदा येथील विश्रामगृहाच्या बाजूला राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुनिल ईरावार (वय ३० वर्षे ) स्वातंत्र्य दिनाच्या सूर्यास्तानंतरच्या रात्री आपल्याच घरी गळफास लावून जीवन यात्रा संपविली.
रविवारी (ता. १६ ) सकाळी सातच्या सुमारास कुटूंबियांनी दरवाजा ढकलला तेव्हा सुनिलचा साडीने गळफास घेतलेला देह लटकतांना आढळून आल्याने हंबरडा फोडला. आजूबाजूला सर्वत्र गर्दी झाली. खबर मिळताच किनवट पोलिस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना सुसाईड नोट मिळाली . त्यात असे लिहिले की ,
" ...यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नये.
आई मला माफ कर
तुझाच सुनिल
... राजसाहेब मला माफ करा आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही आमच्या जवळ नाही .
जय महाराष्ट्र
जय राजसाहेब
जय मनसे
... आई-पप्पा, काका-काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पापूदादा, मला माहित आहे . मी माफ करायच्या लाईकिचा नाही, तरीपण तुम्ही मला माफ करशाल अशी अपेक्षा बाळगतो. "
ग्राम विकास , स्वच्छता, वैद्यकीय सुविधा अशा विविध सामाजिक बाबींसाठी सदैव पुढाकार घेणारे सुनिल ईरावार हे भारतीय पिछडा (ओबीसी) शोषित संघटना, किनवटचे तालुकाध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सनेचे किनवट शहराध्यक्ष होते. त्यांचा सुस्वभाव व आपुलकीची वागणूक यामुळे तरुणांचा घोळका नेहमी त्यांच्या अवती भवती असायचा. त्यांच्या अकाली एक्झिटने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट पोलिस अधिक तपास करीत आहे .
काही दिवसांपूर्वीच प्रकाशित करण्यासाठी त्यांनी पाठविलेलं मनोगत
पुस्तके वाचा , घरीच रहा ,
प्रशासनाला सहकार्य करा,
कोरोनाला विषाणूला हरवा
पुस्तके आपल्या आयुष्यातील खरे सोबती असतात. सध्या संपूर्ण विश्व कोरोना विषाणुच्या महाभयंकर संकटाला तोंड देत असताना फिजीकल डिस्टन्सिंग हा प्रादुर्भावापासून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे.
मात्र या लॉकडाऊनच्या काळात हाताश न होता सर्वांनी विविध विषयांची चांगली पुस्तके वाचावीत. या पुस्तकामधील समृद्ध विचारांनी आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होईल आणि या कठीण प्रसंगी आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यामुळे घरी थांबा सुरक्षित रहा आणि पुस्तक वाचा. पुस्तक हे समाजाला दिशा देण्याचे काम करते. जागतिक क्रांती सोबतच देशाच्या स्वातंत्र्य लढ्या पर्यंत पुस्तक आणि वृत्तपत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
वृत्तपत्रांनी काल क्रांतीची तलवार प्रत्येकाच्या हातात देण्याचं काम केलं. तर पुस्तकांनी त्या तलवारीला विचारांची धार दिली. छत्रपती संभाजी महाराजापासुन महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तींनी सुद्धा अनेक पुस्तकं लिहून ठेवले आहेत. मानवतेच्या कल्याणासाठी उपयुक्त असलेल्या पुस्तक वाचनाने माणसाच्या व्यक्तिमत्व अमुलाग्र बदल होतात.
त्यांच्यातील ज्ञानज्योती जागरूक होते आणि या प्रकाशाने समाजात पसरलेली अशिक्षित ता, अंधविश्वास व अविवेकाचा अंधार दूर होतो. त्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत आणि घरीच राहून प्रशासनाला मदत केली पाहिजे आणि कोरोना विषाणूला हरवलं पाहिजे असे आवाहन करीत आहे.
-सुनिल ईरावार,
किनवट तालुकाध्यक्ष,
भारतीय पिछडा (ओबीसी) संघटन
तथा
शहराध्यक्ष , किनवट,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना .
No comments:
Post a Comment