मुंबई प्रतिनिधी (उदय नरे) : पोलीस अधिकारी सुद्धा वर्दीतील माणूस असतो. त्यालाही मन, भावना, इच्छा-आकांक्षा असतात. समाज माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून नेहमी पोलिसांची मलीन प्रतिमा दाखवली जाते आता ती सुधारण्याची गरज आहे असे प्रतिपादन माजी सहपोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी केले.
अंधेरी येथील यारी रोड मधील चिल्ड्रन वेल्फेअर स्कूल या शाळेच्या सभागृहात मोहल्ला कमिटीची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. देशात कोरोनाची लाट आल्यानंतर पोलीस आणि मोहल्ला कमिटी सदस्य यांच्यातील संपर्क तुटला होता. मोहल्ला कमिटी म्हणजे समाजातील पोलीस आणि जनता यांच्यातील दुवा आहे. विभागातील समस्या सोडवण्यासाठी कमिटीचे सदस्य नेहमी पोलिसांशी संपर्कात असतात ही अभिमानास्पद गोष्ट आहे. ज्यावेळी सर्वसामान्य नागरिक पोलीस स्थानकात येतो त्यावेळी पोलीस अधिकाऱ्याने निदान त्याला पाणी देऊन बसावयास खुर्ची द्यावी आणि त्यांची तक्रार समजून त्याची नोंद घ्यावी अशा सूचना त्यांनी आपल्या पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीनंतर जनतेमध्ये सलोखा व एकोपा राखण्याचे काम मोहल्ला कमिटीने केले होते आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे हे काम आज जागोजागी मोहल्ला कमिटी करत आहे. त्याचा सर्वांना अभिमान आहे. कोव्हीड-19 च्या काळामध्ये पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम न करता जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कोरोना योद्धा म्हणून ते अहोरात्र झटले म्हणूनच मोहल्ला कमिटीचे सर्वोसर्वे चिल्ड्रन वेलफेयर स्कूलचे प्राचार्य अजय कौल यांनी विभागातील पोलिसांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. अंधेरी मधील वर्सोवा, डी. एन. नगर, अंबोली ओशिवरा या विभागातील पोलीस अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी या विभागात अनेक मान्यवर पत्रकार, डॉक्टर, समाजसेवक व प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. याप्रसंगी साहाय्यक पोलिस आयुक्त श्रीमती ज्योत्स्ना रासम विविध विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री. शिराज इनामदार, श्री. भरत गायकवाड, श्री. सोमेश्वर कामते, श्री. संजय बिदाले यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करून मार्गदर्शन केले.
प्राचार्य अजय कौल गेली 23 वर्ष मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवत आहेत. याबद्दल सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अजय कौल सरांचा यथोचित सन्मान केला. मोहल्ला कमिटीची स्थापना व त्यांच्या कार्याची ध्वनीचित्रफीत कार्यक्रमात दाखवण्यात आली. समाजात राष्ट्रीय एकात्मता, सौहार्द व कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत असा विश्वास या कार्यक्रमात व्यक्त केला गेला.





No comments:
Post a Comment