किनवट : किनवट-माहूर तालुक्यातील शेतकरी तसेच व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणीची ठरलेली वीज वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी व अखंडित वीज पुरवठा होण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी (ता.२६) फेब्रुवारी २०२० रोजी पाठवलेल्या पत्राच्या अनुषंगाने तब्बल एक वर्षानंतर माहूर किनवट साठी नवीन वीजवाहिन्या मंजूर केल्याचे पत्र संचालक विद्युत पारेषण कंपनी मुंबई यांनी पाठविले आहे.
वातावरणात थोडाफार बदल झाला की, माहूर-किनवट तालुक्यातील लाईट गुल होणार ! असे काहिसे समीकरण मागील अनेक वर्षापासून सातत्याने पाहायला मिळत आहे. हलक्या स्वरूपाचा वारा जरी सुटला तरी विद्युत पुरवठा बंद केला जातो. माहूरसाठी विदर्भातील गुंज ; तर किनवटसाठी हिमायतनगर येथून वीज पुरवठा घेतला जातो. यात किरकोळ समस्या जरी निर्माण झाली की, वीज पुरवठा खंडित व्हायचा. वारंवार बत्ती गुल होत असल्याने प्रमुख्याने शेतकरी, छोटे कारखानदार, व्यापारी व नागरिकांना याचा मोठा फटका बसायचा. अखंडित वीज पुरवठ्यासाठी जीर्ण झालेल्या वाहिन्या बदलणे महत्त्वाचे होते. परंतु मागील अनेक वर्षात हा विषय कोणत्याच लोकप्रतिनिधीनी हाताळला नसल्याने किनवट-माहूर मतदारसंघातील जनतेला अनेक वेळा अंधारात रात्र काढावी लागली. तर वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागले.
या सर्व बाबींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दीर्घकालीन टिकेल अशा स्वरूपाच्या विद्युत वाहिन्यांची उपयुक्तता लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी आपली इनिंग सुरू होताच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या संचालकांना पत्र लिहून अवगत केले होते. त्या पत्राची दखल घेत तब्बल एक वर्षानंतर माहूर ते गुंज १३२ के.व्ही., माहूर ते किनवट १३२ के.व्ही. व किनवट ते हिमायतनगर १३२ के.व्ही. दुहेरी वाहिनी सोबतच १३२ केव्ही गुंज उपकेंद्राला २२० केव्ही पुसद उपकेंद्राला जोडण्यात आले आहे. तर १३२ केव्ही उपकेंद्र १३२ केव्ही हिमायतनगर उपकेंद्र द्वारे २२० केव्ही भोकर उपकेंद्राला जोडण्यात आले आहे. एकंदरीत या नवीन वीज वाहिन्यांमुळे किनवट व माहूर तालुके २२० केव्ही उपकेंद्र पुसद व भोकरला जोडल्या गेले आहेत. सदर मंजूर वहनाद्वारे भविष्यात माहूर व किनवट परिसरात वीज पुरवठा सुरळीत होऊन वीज ग्राहकांची होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे.
सार्वजनिक समस्येची जाण असलेल्या आमदार भीमराव केराम यांनी दूरदृष्टी ठेवून केलेल्या पत्र व्यवहारामुळे ही बाब पूर्णत्वास गेल्याने दोन्ही तालुक्यात आता ‘बत्ती गुल’ चा त्रास गेला असून वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित होणे या प्रकारापासून एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.




No comments:
Post a Comment