मुंंबई : येथे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार ( दिनांक ११ मार्च, २०२१ ) रोजी इ. १० वी व १२ वी च्या परीक्षांबाबत पालक संघटनांचे प्रतिनिधी व शिक्षकांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या इ. १० व १२ वी च्या परीक्षांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
इ. १० वी व १२ वी च्या परीक्षांमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवावे. कंटेण्टमेंट झोन, लॉक डाउन अथवा कोरोना लागण इत्यादी कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेणे शक्य होणार नाही त्यांच्याबाबत शासनाने विचार करावा. तसेच यासाठी वेगळे शुल्क आकारले जाऊ नये. अशी मागणी पालक संघटनांनी केली.
कोविड -१९ मुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा वेळापत्रकानुसार देणे शक्य न झाल्यास त्या लेखीपरीक्षेनंतर घेण्यात येतील व त्यासाठी वेगळे शुल्क घेऊ नये. अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिल्या.
सह्याद्री वाहिनीवरून होणाऱ्या तासिका वाढवण्याच्या तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नसंचिका उपलब्ध करून देण्याच्या सूचना म. रा. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना मंत्री महोदयांनी दिल्या.
पालकांनी परीक्षेबाबतच्या सूचना महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे पाठवाव्यात. पालकांच्या योग्य सूचनांचा गांभीर्याने विचार करण्यात येईल. पालक संघाने केलेल्या सूचनांचा SOP तयार करताना विचार करण्यात येईल. अशी माहिती मा. मंत्री महोदयांनी दिली. यावर्षीच्या परीक्षा अभूतपूर्व परिस्थितीमध्ये होत आहेत त्यामुळे पालक संघटना व शिक्षकांनी शासनाबरोबर एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन मंत्री महोदयांनी केले.
या बैठकीस पालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिक्षण विभागातील खालील अधिकारी उपस्थित होते.
१. श्रीम. वंदना कृष्णा – अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग.
२. श्री. दिनकर पाटील – अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ, पुणे.
३. श्री. दिनकर टेमकर - संचालक, म. रा. शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे.
४. श्री. विकास गरड - उपसंचालक, म. रा. शैक्षणिक संशोधन वप्रशिक्षण परिषद, पुणे.





No comments:
Post a Comment