आदिलाबाद : मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी तेलंगाणात सध्या बारावीपर्यंत सुरु असलेले मराठी भाषेतील शिक्षण पदवी व पदव्युत्तर पर्यंत करण्याचा मी प्रयत्न करेन , असे प्रतिपादन आमदार आमदार जोगू रामन्ना यांनी केले.
येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मराठी भाषा लोककल्याण समितीच्या वतीने आयोजित भाईचारा बहुभाषिक कविसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी संदेश भारद्वज, मोहनराव ताथोडे, उद्योजक बजरंगलाल अग्रवाल, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, गंभीर ठाकरे, रवींद्र राऊत, विष्णू मुखाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशातील महान व्यक्ती : गुरु रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज, संत गाडगे बाबा, मोतोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करतांना प्रसिद्ध कवी मधु बावलकर म्हणाले की, " शिक्षणासाठी साहित्य चळवळ गतीमान करणे काळाची गरज आहे. आजचा वाचक पुस्तकापासून दूर होत चाललाय. सांस्कृतिक विकास करायचा असेल तर, साहित्यिक चळवळी सोबत शैक्षणिक चळवळ ' पढ़ाईची लढाई ' झाली पाहिजे. "
याप्रसंगी प्रमुख अतिथी पंडित चव्हाण (विचारवंत, नांदेड) यांनी विचार मांडले. जन आरोग्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठी भाषीक जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष अभियंता तथा अभिवक्ता ऍड. राठोड सुभाष नायक यांनी स्वागताध्यक्ष या नात्याने पाहुण्यांचे स्वागत केले.
या कविसंमेलनात प्रशांत वंजारे (यवतमाळ), भाऊराव लोखंडे (बल्लारशा ), शंकर कारम, हरिकृष्णा कुर्मे (आंतरराष्ट्रीय कवी), डॉ.एम.ए.खदीर,दत्तू शिंदे, महेश लेकरिया (आदिलाबाद) गाजी बद्रोद्दीन बदर, शाख अन्वर (आदिलाबाद), प्रा.डॉ.आनंद भालेराव, माधव वाघमारे, गणेश मेकाणे (आदिलाबाद), अशोक भगत (वणी), महानंद भारती (घाटंजी), कमला नरसिमल्लू, इलया मन्ने, गंगाधर कयापाक या कविंनी आपल्या बहारदार रचना सादर करून कविसंमेलन गाजवले.कवि गोपाल नादान मिश्रा यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीचे अनिल साळवे, दुधागिरी थोरात, रवींद्र ताथोडे, गंगाधरी गंगन्ना, तुकाराम जीवने, अनिल साळवे आदिंनी परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment