वाई : संविधानातला भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने विज्ञानाची वाट , ज्ञानाची कास आणि एकमेकांचे सहकार्य घेऊन पुढे गेले पाहिजे . तसेच भारताला पुढे जाण्यासाठी संविधानाशिवाय दुसरा पर्याय नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत डॉ . बाबा आढाव यांनी केले .
स्वातंत्र्यसैनिक शंकरराव जेजुरीकर यांच्या २९ व्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात डॉ . बाबा आढाव यांना सर्वोदयी चळवळीचे जीवनदायी कार्यकर्ते विजय दिवाण यांच्या हस्ते संत गाडगे महाराज पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . त्या वेळी सत्यशोधक प्रबोधनाची आवश्यकता या विषयावर डॉ . आढाव बोलत होते . ते म्हणाले , सत्यशोधनाची चळवळ विद्वानांच्या पातळीवर न राहता ती संपर्क आणि संवादाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत गेली पाहिजे . आज गावात मंदिर - मशीद व बुद्धविहारे आहेत , मात्र गावातील सर्व स्त्री- पुरुष भारतीय म्हणून एकत्रित येतील असे ठिकाण नाही. त्यासाठी गाव तिथे संविधान घर निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले .
जात - धर्म ही व्यक्तिगत बाब असून आपल्या सार्वजनिक जीवनात ती येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले . विजय दिवाण म्हणाले , आजची सामाजिक व राजकीय परिस्थिती ही संभ्रम निर्माण करणारी व पराजित मनोवृत्तीकडे घेऊन नेणारी आहे , अशा काळात पुरोगामी संघटनांनी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी संगितले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे शामराव कर्णे व सुत्रसंचलन विठ्ठल माने यांनी केले. विनायक जेजुरीकर यांनी आभार मानले .
तत्पूर्वी वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ . शीतल जानवे-खराडे यांच्या हस्ते सकाळी स्वातंत्र्यसैनिक जेजुरीकर यांच्या समाधीस्थळावर पुष्पचक्र वाहण्यात आले . याप्रसंगी वाई व परिसरातील नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऍड . राजू जेजुरीकर , प्राचार्य डॉ . प्रकाश कुंभार , शामराव कर्णे , सूर्यकांत आंबेकर , उदय शिंदे , विनायक जेजुरीकर आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment