मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : कोरोना विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी / कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमधील बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर कोरोनाच्याकाळात बंद करण्यात आला होता.
आता मदत व पुनर्वसन विभागाच्या आदेशान्वये कोविड विषयक निर्बंध उठविण्यात आलेले आहेत. तसेच सर्व शासकीय कार्यालयातील उपस्थिती १००% क्षमतेने सुरू झालेली आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांची उपस्थिती आता बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीवरच नोंदविण्यात यावी. अशाप्रकारे उपस्थिती नोंदविताना खबरदारीची बाब म्हणून कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा (जसे मास्कचा वापर सुरक्षित अंतर सॅनिटाईझरचा वापर) वापर ऐच्छिकरीत्या सुरु ठेवण्यात यावा. सर्व शासकीय कार्यालयाच्या आस्थापना शाखांनी सर्व अधिकारी / कर्मचारी कार्यालयात येताना व कार्यालय सोडताना त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीवरच नोंदवित आहेत, याची दक्षता घ्यावी.
माहिती तंत्रज्ञान उपविभाग, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी शासकीय कार्यालयातील सर्व ठिकाणची बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली पूर्ण क्षमतेने सुरू राहण्याची दक्षता घ्यावी. अशा प्रकारचे परीपत्रक काढले आहे. या मुळे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना तसेच यापुर्वी ज्या ठिकाणी अशा पध्दतीने उपस्थीतींची नोंद होत होती त्याठिकाणी पुन्हा बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीचा वापर पुन्हा सुरू होणार आहे. सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) जितेंद्र महाजन यांनी या प्रणालीचे स्वागत केले आहे.
No comments:
Post a Comment