नांदेड : जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या 3719 शाळा आज उत्साहात सुरू झाल्या. नवागत विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल उत्सव क्षणात टिपण्यासाठी पहिल्या पावलाचे कागदावर ठसे कागदांवर घेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी अर्धापूर तालुक्यातील पार्डी मक्ता, हदगाव तालुक्यातील देशमुखवाडी आणि हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायतींना भेटी देऊन पालक मेळावा, रॅली आणि प्रत्यक्ष विद्यार्थी प्रवेशाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
पहिल्या दिवशी सर्व मुलांची पटनोंदणी झाली पाहिजे आणि उपस्थिती टिकावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सर्व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांची शाळा पूर्वतयारी कार्यशाळा घेतली होती. या कार्यशाळेत केलेल्या आवाहनानुसार सर्व शाळांनी उत्तम प्रतिसाद दिला असून हा शाळा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला.
सर्व शाळांमध्ये पालक मेळावे, प्रवेश रॅली, प्रभात फेरी, वृक्षारोपण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील लोकनेते गावचे सरपंच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य माता-पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यासह महसूल यंत्रणेतील अधिकारी, तालुकास्तरावरील तहसीलदार, नायब तहसीलदार , गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, विषय तज्ज्ञ, अशा सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भेटी देऊन आज शाळांच्या प्रवेश उत्सवात सहभाग घेतला.
सर्व शाळांनी 100% पटनोंदणी पूर्ण केली असून शाळा पूर्व तयारी करून घेतल्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 92 टक्केच्या वर राहिली. काही शाळांनी ते 100 टक्के उपस्थिती राखण्यात यश मिळविले आहे. पहिली ते आठवी च्या 3,34000 विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे सर्व शाळा स्तरावर वितरण करण्यात आले. माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत रुचकर भोजनाची व्यवस्था सर्व शाळावर करण्यात आली होती. जिल्ह्यातील अनेक शाळांतील विद्यार्थी गणवेशात उपस्थित होते.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे भेट दिली. विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त स्वागत व प्रवेश प्रकिया पाहिली. शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ. सविता बिरगे यांनी किनवट तालुक्यातील परोटी तांडा, कोसमेट या जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. आदिवासी परिक्षेत्रातील भेट लक्षणीय महत्त्वाची ठरली. विद्यार्थ्यांची रॅली आणि प्रवेश उत्सवात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी किनवटचे गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पर्यायी शिक्षण प्रमुख डी.टी सिरसाठ सोबत होते. प्रत्येक मुलांचे गुलाब पुष्प देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. रवींद्र आंबेकर, अधिव्याख्याता जयश्री आठवले, चंद्रकांत धुमाळे, श्रीकृष्ण देशमुख, माणिक जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, दिलीप बनसोडे, माधव सलगर, संतोष शेटकार, नाईकवाडे, समग्र शिक्षाचे डॉ. विलास ढवळे, अर्चना बागवाले, सविता अवातीरक आदींनी शाळा भेटी दिल्या. जिल्ह्यातील 750 पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शाळा भेटी दिल्यामुळे चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण झाले.
No comments:
Post a Comment