नांदेड : येथून जवळच असलेल्या मारतळा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे शाळा बंद होत्या. लॉकडॉऊनमुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत झालेल्या मजुरांमुळे मोठ्या प्रमाणावर मुले शाळाबाह्य झाल्याचं चित्र सर्व महाराष्ट्रभर दिसत आहे. त्या सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळून देण्यासाठी ता.5 जुलै पासून राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून मिशन झिरो ड्रॉप आऊट या मोहिमेस प्रारंभ केला आहे. यात प्रामुख्याने अनियमित व स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना आढळलेल्या परिसराच्या शाळेत दाखल करण्यास मदत करणे या अनुषंगानेच नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली व बालरक्षक विभाग समन्वयक डॉ. दादाराव सिरसाट यांच्या सहकार्याने नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या परिसरात या मोहिमेस प्रारंभ झाला आहे.
यातच जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा बालरक्षक रवी ढगे यांनी गेल्या अनेक वर्षापासून शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. वर्ष 2018 साली 2 तर वर्ष 2019 मध्ये 4 मुलांना आणले आहे. याचाच एक भाग म्हणून मारतळा ते कापशी रोडवर मुस्तफा शेख यांच्या शेतात शेतातील मोलमजुरी करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील आखाडाबाळापूर व नायगाव तालुक्यातील गोधनगाव या गावचे मातंग समाजाचे कुटुंब आपल्या मुलाबाळांसह उदरनिर्वाहासाठी येथे आले आहे. सदरील कुटुंबाला भेट दिली असता दोन शाळाबाह्य मुली व एक शाळेत अनियमित असणारा मुलगा आढळला. कुटुंबातील सदस्यांना रवी ढगे यांनी शिक्षणाचे महत्त्व व शासनस्तरावर राबवल्या जाणाऱ्या विविध योजना याबाबत माहिती दिली. असता पालकांनी आपली मुले शाळेत पाठवण्यासाठी सकारात्मकता दाखवली. यात वयानुरूप दिपाली माधव गायकवाड (वय वर्षे) सात हिला पहिलीत प्रवेश देण्यात आला ; तर आरोही किरण सूर्यवंशी (वय नऊ वर्षे ) हिला तिसरीत प्रवेश देण्यात आला. तर शाळेचा जुना विद्यार्थी वर्ग चौथीत असणारा आदित्य रोहिदास वाघमारे या मुलांना नुकतेच शाळेत आणून त्यांचे यथोचित स्वागत करून शाळेच्या वतीने शालेय साहित्य गणवेश,पुस्तके, देण्यात आली. शासनाच्या मिशन झिरो ड्रॉप आऊट अभियानाची प्रभावी अंमलबजावणी बालरक्षक रवी ढगे यांच्या माध्यमातून झालेली दिसून येते. हाच कित्ता जिल्ह्यातील इतर शिक्षकांनी गिरवला तर मोठ्या प्रमाणावर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होणार आहे. याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांकडून तसेच शिक्षण व बालरक्षक विभाग या सर्वांच्या वतीने शिक्षकांच्या कार्याचे कौतुक होत आहे.




No comments:
Post a Comment