हिंगोली : ता. 13 : आठवडाभरापासून हिंगोली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना व गावालगत असलेल्या ओढे आणि नाल्यना आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरांचे आणि खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तर काही ठिकाणी पुरामध्ये जनावरे वाहून दगावली असल्याने शेतकरी राजा अडचणीत आला आहे . जिल्ह्यात अतिवृष्टीने पूरग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे सर्व सामान्यांना प्रशासनाने अलर्ट राहुन दिलासा देण्याचे काम करावे असे निर्देश हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी पत्राद्वारे दिले.
जुलैच्या आठवड्यात समाधान कारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. बिज अंकुरत असताना आठवडाभरापासून संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत , कळमनुरी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. सोबतच नदी नाल्यना आलेल्या पुरामुळे खरीप पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची गोठ्यातील जनावरे पुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत. नैसर्गिक व अस्मानी संकटामुळे शेतकरी पुर्णपणे कोलमडुन पडला आहे. तेव्हा प्रशासनाने निष्काळजीपणा न करता प्रत्यक्ष गावात आणि शेतीच्या बांधावर जाऊन तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कामाला लागावे असे देखील खासदार हेमंत पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्यासह तहसिलदार, बिडीओ, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांना सूचना केल्या आहेत.
आठवडाभरानंतर देखील पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड हाल होत आहेत. पुरात अकडुन पडलेल्या नागरीकांना सुरक्षितस्थळी पोहचवणे, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करणे या सोबतच शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना संबंधित अधिकारी यांनी कामात कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करु नये, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव त्यांच्या सोबत होता कामा नये, असे देखील खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना ठणकावले आहे.
No comments:
Post a Comment