चंद्रपूर (आशा रणखांबे ) , ता .15 :समाजाच्या प्रती, राज्याच्या प्रती आणि देशाच्या प्रती कर्तव्य पार पाडणे हेच आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. हे ठणकावून सांगणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा हा देश हितासाठी होता. असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अधिवक्ता ऍड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी केले.
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ऊर्जानगर वसाहत यांच्या विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समारोह 2023चे आयोजन खुले रंगमंच पटांगण व स्नेहबंध सभागृह ऊर्जा नगर वसाहत महाऔष्णिक विद्युत केंद्र, जिल्हा चंद्रपूर, येथे शुक्रवारी (ता. 14 एप्रिल 2023) सकाळी 11 वाजता करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने, फुले शाहू आंबेडकर विचारधारा आणि आपली जबाबदारी या विषयावर विचार मांडतांना ठाण्यातील आंबेडकरी चळवळीतील, विचारवंत, अधिवक्ता ॲड. प्रज्ञेश चैतन्य सोनावणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज सपाटे होते ; तर प्रमुख अतिथी म्हणून कार्यकारी संचालक तथा मुख्य अभियंता शाम राठोड, उपमुख्य अभियंता सुहास जाधव, उप-अभियंता मिलिंद रामटेके आणि उपमुख्य अभियंता ए.टी.पुनसे विचार मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित काही महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करतांना आपल्या भाषणात ते पुढे असे म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चारही महापुरुषांचा विचार मानवतावादी विचार होता. मानवी मूलभूत हक्कांसाठी त्यांचा लढा होता. प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा होता. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज आपल्याला सर्व अधिकार तर मिळाले परंतु कर्तव्य दिले असताना आपण मात्र कर्तव्याकडे दुर्लक्ष करत आहोत. समाजाच्या प्रती, राज्याच्या प्रती आणि देशाच्या प्रती कर्तव्य पार पाडणे हेच आपले आद्य कर्तव्य मानले पाहिजे. समाजातील तरुण वर्गाचे वैचारिक मंथन होणे आवश्यक आहे. काही व्यवस्था महापुरुषांच्या विचारांची चुकीची माहिती समाज माध्यमातुन व्हायरल करत असतात, त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होत आहेत. ते गैरसमज दूर करण्याची आजच्या तरुण वर्गाने जबाबदारी घेतली पाहिजे. आपल्याला आयुष्य हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाले आहे हे कोणीही विसरता कामा नये, कारण हक्क अधिकार हे कुठेही मिळत नसतात त्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष या महापुरुषांनी केला. आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा सर्वोच्च अधिकार दिला आणि तोच आपल्याला विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जायचं आहे.
सदरील कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे कार्याध्यक्ष भैयाजी उईके, सहकार्याध्यक्ष एकता मेश्राम, सचिव दिलीप मोहोळ, कोषाध्यक्ष विनीत रामटेके, विलीन माहुलकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांनी जयंतीच्या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.




No comments:
Post a Comment