किनवट (नांदेड ) ता. 17 फेब्रुवारी : राज्यातील 25 हजार अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह उभारणार असून, यात किनवट, माहूर व हिमायतनगरचा समावेश असेल, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी रात्री किनवट येथे केली.
किनवट येथील समतानगरात आयोजित चौदाव्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेला मार्गदर्शन करताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट बोलत होते. यावेळी किनवटचे आमदार भीमराव केराम, हदगावचे आमदार बाबूराव कदम कोहळीकर ,उमरखेडचे माजी आमदार विजय खडसे, संयोजक दया पाटील, अध्यक्ष सुनील भरणे आदींची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे. किनवटमध्ये 100 मुलांसाठी तर माहूर व हिमायतनगरमध्ये 100 मुलींसाठी 15 ते 20 कोटी रुपयांची वसतिगृह उभारण्यात येणार असून, येत्या 3 ते 4 महिन्यात या कामाच्या भूमिपुजनाला आपण स्वतः येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
किनवटमध्ये सातत्याने चौदा वर्षांपासून धम्म परिषद होते, ही बाब कौतुकास्पद आहे. डॉ. बाबासाहेबांनी काय निर्माण केले, हे पाहायचे, ऐकायचे असेल, तर धम्म परिषदेत आले पाहिजे. समाज जागरुक होत असला, तरी समाजव्यवस्था परिपूर्ण नाही. अन्याय, अत्याचार सुरूच आहेत. समाजाने मागणारे नव्हे, तर देणारे व्हावे. बाबासाहेबांची ताकद इतकी प्रचंड आहे की, त्यांच्या नावाशिवाय राजकारणच होवू शकत नाही. समाजाने चिंता न करता संघर्षातून पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आमदार भिमराव केराम, आमदार बाबूराव कदम, विजय खडसे यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. ऍड.सुनील येरेकार यांनी आभार मानले. मंत्री संजय शिरसाट यांनी शहरातील गजानन महाराज मंदिर तसेच संथागार वृद्धाश्रमास भेट दिली.
यावेळी मंचावर बसपाचे नेते मनीष कावळे , छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंझाळ, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे , युवासेना जिल्हा प्रमुख संदेश पाटील, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, अरुण आळणे, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्माणीवार , तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, शहरप्रमुख सुरज सातूरवार, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम, महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment