नांदेड ( मिलिंद व्यवहारे ) :
वृक्ष लागवड व संवर्धनाची जबाबदारी प्रशासनासह सर्व नागरीकांची आहे. याकरिता प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड वन विभाग आणि नांदेड सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथील केमिस्ट भवन येथे बुधवारी (ता. 5 जून ) घेण्यात आलेल्या " एक झाड माझे " या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नांदेड-वाघाळा महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, ब्रम्हकुमारी शिवकन्या बहेनजी, शारदिनी अशोक काकडे आदींची मंचावर उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, वन विभागाच्या वतीने जिल्हयात वृक्ष लागवडीसाठी नियोजन केले असून, शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था व नागरीकांनी पुढाकार घेवून वृक्ष लागवड करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले. केमिस्ट भवन परिसरात वृक्ष लागवड करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल व रोप देवून सत्कार करण्यात आला. वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे म्हणाले, झाडा अभावी तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यात सकारात्मक बदल घवून आणण्यासाठी वृक्ष लागवड करावी.
यावेळी बोलतांना महापालिकेचे आयुक्त लहूराज माळी म्हणाले, नांदेड शहरात महापालिकेच्या मोकळया जागेत, रस्त्याच्या कडेला नागरीकांना झाडे लावण्यासाठी महापालिकेची परवानगी असेल परंतु लावलेल्या झाडाचे नागरिकांनी संवर्धन करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मणराव क्षीरसागर यांनी केले.अशोक गंजेवार यांनी आभार मानले. यावेळी जैन संघटनेचे हर्षद शहा, नांदेड सोशल मिडीयाचे दीपक मोरताळे, राजीव जैन, अमित काबरा, दीपक कोठारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कोंडेकर, अर्पना सावळे, डॉ. भारत जेठमलानी, प्रा.डॉ. शंकर विभुते, विठ्ठल पावडे, विजय होकर्णे, ओमकार काकडे, केदार काकडे, मिलिंद व्यवहारे, महेंद्र मामीडवार, प्रदिप काळे, तानाजी हुस्सेकर, सदा वडजे, भारत होकर्णे, यांच्यासह वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, नांदेड सोशल ग्रुपचे सदस्य, विविध स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व शहरातील वृक्षप्रेमी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
जिल्हा हिरवागार करण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे- सिईओ अशोक काकडे
प्रत्येक व्यक्तींनी झाडे लावून त्याचे संवर्धन केल्यास जिल्हा हिरवागार होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आली आहे. या उपक्रमात नागरीकांनी सहकार्य केल्यास ही संकल्पना पूर्णत्वास येईल असे मत नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले. मागच्या वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हयात 18 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायतीमधून सुमारे तीन हजार वृक्ष लागवडीचे उदिष्ट असल्याचे त्यांनी सांगीतले. गावस्तरावर शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत व सार्वजनिक ठिकाणासह प्रत्येक घरासमोर झाडे लावण्यात येतील. ज्या शाळांना संरक्षक भिंत नाही अशा शाळांना आता वृक्ष लागवड करुन संरक्षक कुंपन तयार करण्यात येणार असल्याचा संकल्प श्री काकडे यांनी मांडला. सावली देणारं झाडं काय असतं हे मुलांनाही कळाले पाहिजे. वृक्ष लागडीचे महत्व शाळांस्तरावरून रूजविण्यात येणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
शालेय विद्यार्थ्यांना ट्री कार्ड देण्याची संकल्पनाच
शालेय विद्यार्थ्यांना वृक्ष लागवडीचं महत्व पटावं यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ट्री कार्ड देण्याची संकल्पना विचारधिन असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी दिली. यासाठी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक आहे. प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला एक ट्री कार्ड देण्यात येईल. यामध्ये वृक्ष लागवड केल्याची तारिख, पाणी देण्याच्या नोंदी, वाढत्या झाडाची उंची मोजने, फांद्या व पानांची नोंद, संवर्धन करतांना झाड करपलं असेल तर दुसरे झाडं कधी लावले अशा नोंदी या कार्डात घेण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी बोलून दाखवली. यासाठी शिक्षण विभागासह स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले.
No comments:
Post a Comment