" आज आपल्या आंबेडकरी चळवळीची शोकांतिका प्रत्येक जण मांडत सुटला..त्यातून चांगले काहीतरी निश्चित घडेल..अशी अपेक्षा असते..दिवसेंदिवस समाजात गद्दारांची ,दलालांची ,स्वार्थांधांची, बेगडी नेतृत्वाची संख्या वाढते आहे...
ज्यातून समाजाला पोषक विचाराची वातावरण निर्मिती न होता ,समाजासाठी घातक नेतृत्व तयार होत आहे..कुणी कुणाशी कधी कोणत्या क्षणी हातमिळवणी करून केवळ आपल्या स्वार्थासाठी अवघ्या समाजाचा सौदागर बनेल सांगता यायचं नाही ..म्हणून हे नेतृत्व पारखनं ही फार मोठी जबाबदारी वा आव्हान समाजापुढे दिवसेंदिवस ऊभे राहत आहे....चळवळीची वाताहात लावणारी ही माणसं ओळखणं ही फार अवघड बाब होऊन बसली आहे...याच आशयावर प्रसिद्ध कवीप्रा.नंदू वानखडे यांची कविता... खास चळवळीतील वाचक कार्यकर्त्यांसाठी येथे देत आहोत -संपादक "
मले लिडर बनण्याची खाज.... !
मले 'लिडर' बनण्याची खाज
आलो साहेबाले भेटून आज..
तुमच्या दावणीले बांधतो समाज
आणू पुन्हाही तुमचंच राज....!
नाही आम्हाला ऊरली लाज...
आम्ही एक नंबर धोकेबाज..
जावो ! खड्ड्यात गेला समाज..
आधी जमवा बा जुगाड माझं...!
म्हणू भिमाचे वारसदार...
अंगी भरलया खुर्चीचं वारं...
केली बोथट चळवळीची धार..
सिंह छाव्याची अशी माघार....!
अशी गद्दार झालीत लोकं
नाही जाग्यावर आपुलं डोकं..
भरला भुसा झाली बिनडोकं...
कुठं राहीलं चळचळीचं टोकं...?
सरला बाणा आता तो लढाऊ..
समाज विकून खाल्ला ना भाऊ..
कसा ऊघड्या डोळ्यानं मी पाहू...
लिहतो कविता मी राहू राहू...!
ऊरले मागे काही शेरदिलं...
त्याचं पडलंया कंबडकं ढिलं...
आम्हा भिमानं जे काही दिलं...
त्यावर जगतात आता ही पिलं..!
आम्ही समजो जे विचारवंत
तेच चळवळ पोखरती जंत...
सांगती समरसताआपलेच पंत..
हीच समाजासाठी लयी खंत...!
तुम्ही जुळवूनी घेता कुणाशी..?
आधी विचारा आपुल्या मनाशी..
करता गद्दारी बहुजनाशी....
गोड दुधात कालवून माशी...!'
हा रस्ता गुलामीकडे जाते...
चळवळीचे सोडोनी ते नाते...
होई एकट्याचे मालामाल खाते...
काय कामा ते बहुजना ते....?
किती लपलेत पडद्याआड..?
करती समाजात ते बिघाड...
झाले आपलेच आपल्याला दाड..
असे जमवू जमवू जुगाड...!
झाली चळवळीची वाताहात..
कुणी ऐके ना कुणाची बात..
कुणी मिळवती कुणीशी हात..
काढती फोटोही विचकून दात...!
अशी कशी ही खुर्चीची हावं..
जगती बापाचं विसरून नाव...
काय समाजानं बोध घ्यावं...
अशा लबाडा, लोटून द्यावं...!'
हितशत्रूंनी टाकलेत गळं..
पाहती ढवळून आपला तळं..
असा गद्दार तयाशी मिळं....
ज्याने बुडाली ही चळवळ...!
माझा समाज होई ना एक
आम्हा मिळेना पुढारी नेक..
नुसती डोळ्यात ही धुळफेक..
सारे बाऊन्स झालेत चेक...!
झाले शिकार सारे शिकारी
ते भिका-याहूनी भिकारी..
विकली भिमाची श्रीमंती सारी
आता फिरताती दुस-या दारी...!"
बघ ,आढावू ऊगवलं पिकं..
माझ्या पोरा ,तू काही तरी शिक..!
तुमच्या पिढीनं मागू नये भिक..
म्हणून सांगतो तुला हे कवतिक...!'
नंदू 'लेखणी नव्या दमाची..
करं समिक्षा ख-या श्रमाची...
बरं वाईट- समाज वाची...
होई प्रगती तयाने त्याची...!"
सारा समाज विखुरला माझा..
रोज पेपरात गट तट ताजा....
त्यांनी विकून खाल्ल्यात लाजा..
एक व्हावे हा प्रयत्न माझा....!'
-प्रा.नंदू वानखडे,
मुंगळा जि.वाशिम
-9423650468..
No comments:
Post a Comment