किनवट :
सध्या शहरात ५ व १० रुपयांच्या कोर्ट फी तिकिटांचा तुटवडा जाणवत आहे. याचा फायदा घेऊन काही मुद्रांक विक्रेते हे १० रुपयाचे तिकिट १२ रुपयाला विकत आहेत, तर ५ रुपयाचे तिकिट ८ रुपयाला विकत आहेत. मागील कांहीं महिन्यांपासून तर ५ रुपयाचे तिकीटच आणने मुद्रांक विक्रेत्यांनी बंदच केले आहे. तसेच १०० रुपयांचा बाॅंड पेपर १२५ रुपयाला विकत आहेत, यामुळे लोकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या कडे मुद्रांक शुल्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष घालून जनतेची पिळवणूक थांबवावी, अशी मागणी किनवट न्यायालय वकील संघाने बुधवारी (ता.२०) निवेदनाद्वारे केली आहे.
किनवट हा डोंगराळ व अतिदुर्गम भागात वसलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुसंख्य जनता ही आदिवासी, बंजारा व मागास वर्गातील आहे. तसेच दारीद्र्यरेषेखालील आहे.
लोकांना कोर्ट कामासाठी व कार्यालयीन कामासाठी ५ व १० रुपयांच्या तिकिटासह १०० रुपये २०० रुपये व त्या पुढील रक्कमेच्या बाॅंड पेपर खरेदी करावे लागतात. अशा वेळी मुद्रांक विक्रेते हे जास्त रक्कम आकारुन लोकांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत.
अगोदरच दुष्काळाच्या सावटात असलेली जनता त्रस्त झालेली आहे,अशा कठीण परिस्थितीत मुद्रांक विक्रेत्यांनी जास्तीची रक्कम वसुल करु नये व दुष्काळाने हैराण झालेल्या लोकांना दिलासा द्यावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंजाब गावंडे, उपाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे ,सचिव अॅड. दिलीप काळे, सहसचिव अॅड. राहुल सोनकांबळे व कोषाध्यक्ष अॅड.यशवंत गजभारे यांच्या स्वाक्ष-या आहेत.
याबाबत एका मुद्रांक विक्रेत्याला विश्वासात घेऊन बोलते केले असता त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, किनवटच्या उपकोषागार कार्यालयातून आम्हालाही वर पैसे द्यावे लागतात या सबबीखाली आमच्याकडून जास्तीची रक्कम उकळली जाते त्यामुळे आम्हालाही ग्राहकांकडून नाईलाजाने जास्त पैसे घ्यावे लागतात.




No comments:
Post a Comment