किनवट :
पूर्व व दक्षिणेस पैनगंगा नदीचं विस्तीर्ण अन् मोठ्या डोहाचं क्षेत्रं तर उत्तरेस डोंगर... यातून वाट काढत पश्चिमेस लक्कडकोट हे पन्नास उंबऱ्याचं गाव... तालुका मुख्यालयापासून १४ किलोमीटर अंतर... वन विभागाच्या जमिनीमुळं स्वातंत्र्यानंतर साठ वर्षातही या गावाने रस्ता पाहिला नव्हता... उँ हॅूं... एसटी पाहिली नव्हती... गावातील चौथीपर्यंतची शाळा झाली की शिक्षण बस्स... म्हणून तर आज गावातील कोणी कर्मचारी आढळत नाही... पैनगंगेच्या पाण्यावर शेती करायची व त्यावरच समाधान मानायचं यांचा तो शिरस्ता... आता कसाबसा का होईना गावात रस्ता झाला... गावात आता नवे गुरूजी आले... त्यांनी शाळा आकर्षक सजवली... त्यात आणखी भर घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेनुसार गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (ता.18) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लक्कडकोट येथे 'माजी विद्यार्थी मेळावा व पालक सभेचं' आयोजन करण्यात आलं होतं.
मुख्याध्यापक संतोष दासरवार अध्यक्षस्थानी होते. मारेगाव (वरचे) केंद्राचे केंद्रप्रमुख विजय मडावी,सरपंच गणपत भोपे हे प्रमुख पाहुणे होते.
शाळेतील तंत्र स्नेही शिक्षक रुपेश मुनेश्वर यांनी प्रास्ताविकातून प्राथमिक शिक्षणाचे महत्व सांगत गावकऱ्यांना आपली शाळा डिजिटल करण्यासाठी सढळ हाताने मदत करण्याकरिता प्रेरित केले. केंद्रप्रमुख विजय मडावी यांनीही आपल्या मार्गदर्शनातून पालकांना मुलांच्या शिक्षणात तंत्रज्ञान , संस्कार , नितीमूल्ये याचे महत्वाचे स्थान समजावून दिले व शाळा डिजिटल करण्यासाठी सर्वांनी मदत करावी अशी साद घातली . गावकऱ्यांनीही उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देत सर्वतोपरी मदत करण्याची हमी दिली आणि मेळाव्यातच दानशूर दात्यांनी लोकवर्गणी जमा करायला सुरवात केली अन् बघता बघता बैठकीतच 8200 रुपये (आठ हजार दोनशे रुपये ) नगदी लोकवाटा जमा झाला. काहींनी आपल्या रक्कमा जाहीर केल्या. ज्यांनी ज्यांनी नगदी लोकवाटा जमा केला त्यांचे पुष्पगुच्छ देऊन केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक , सरपंच यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच गणपत भोपे यांनी लवकरच शाळेला संरक्षण भिंत करुन देण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे शाळा डिजीटल करण्याचा ध्यास ग्रामस्थांनी घेतला. शाळेचे मुख्याध्यापक संतोष दासरवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष शिंदे, उत्तम शिंदे, वसंत मोरे, विकास जाधव ,विलास मोरे, नागनाथ राइकवाडे, शामराव कदम,प्रभाकर शिंदे , प्रमेश्वर जाधव, ज्ञानेश्वर कदम, रमेश भोपे, दत्ता कदम, सुरेखा चव्हाण, विमल जाधव, विष्णू पवार , रुपेश भोपे यांनी परिश्रम घेतले. शाळेचे माजी विद्यार्थी , गावातील नागरिक , अंगणवाडी कार्यकर्ती ब नवयुवक या मेळाव्यास मोठ्या संखेने उपस्थित होते.





No comments:
Post a Comment