किनवट : तालुक्यातील तल्लारी - झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्या च शेतात एकापाठोपाठ तीन दिवसाच्या फरकाने दोन बिबट्यांचा मृतदेह आढळल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली.
शनिवारी ( दिनांक 18 एप्रिल ) ही घटना उघडकीस आल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व किनवट वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला . पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले त्यानंतर त्या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, किनवट तालुक्यातील तल्लारी व झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू शेळके यांच्या शेतात एकापाठोपाठ दोन बिबट्यांचा मृतदेह आढळून आल्याने नांदेड वन विभागामध्ये व किनवट वन विकास महामंडळामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. या पैकी एका बिबट्याचा मृत्यू बुधवारी (दि. 15 एप्रिल ) मृतदेह मिळून आला होता . किनवट वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पंचनामा व शवविच्छेदन करून त्याचा अंत्यविधी केला होता .या घटनेला दोन दिवस उलटले नाही ; तर आज दि . 18 एप्रिल रोजी दुसऱ्या बिबट्याचा मृतदेह त्याच शेतकऱ्यांच्या शेतात आढळला. यापूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याच्या ठिकाणा पासून पन्नास फूट अंतरावर पुनःश्च एका बिबट्याचा मृतदेह मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन या गंभीर घटनेची माहिती नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांना दिली .अशा या गंभीर घटनेची दखल घेत नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मृत अवस्थेत असलेल्या बिबट्याची प्रत्यक्ष पाहणी केली .सदर बिबट्याचा पंचनामा करून पशुधन विकास अधिकारी डॉ. व्हि.एल. बिराजदार, अजय शिवणकर, ओम प्रकाश शिंदे, एस एन मिराशे यांनी बिबट्याचे शवविच्छेदन करून वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले . एकापाठोपाठ दोन बिबट्याचा मृतदेह आढळल्याने त्याच्यावर विषप्रयोग केला की काय अशी शंका वर्तवली जात असताना गावातील लोकांना विश्वासात घेऊन याचा तपास करा असा सल्ला नांदेड वन विभागाचे उपवनसंरक्षक अशिष ठाकरे यांनी यावेळी वनविकास महामंडळाचे उपविभागीय व्यवस्थापक एस. एच. व्यास व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिला. असे असेल तरीही किनवट वन विकास महामंडळाच्या जंगलात कमठाला व सिरमेटी शिवारातही मागे दोन-तीन महिन्याखाली दोन बिबटे मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप पर्यंत समोर आलेले नाही. वन विकास महामंडळाच्या ताब्यातील जंगलात सतत होणाऱ्या या हिंस्र प्राण्यांच्या मृत्यूच्या कारणांचा तपास लागत नाही . त्यामुळे या भागात हिंस्र प्राण्यांना मारणारी शिकाऱ्यांची टोळी सक्रिय आहे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ या गंभीर गोष्टीकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. असे परिसरातील वनप्रेमी नागरिक बोलत आहेत .





No comments:
Post a Comment