किनवट : राज्यातील मराठवाडा वैधानिक विकास मंडळासह इतरही विकास मंडळाची मुदत संपल्याने त्यांना मुदतवाढ देण्याची आग्रही मागणी आमदार भीमराव केराम यांनी दिनांक 21 जुलै रोजी पत्रकाद्वारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांना केली असून यासंदर्भात लॉकडाउन शिथील झाल्यानंतर भेट घेणार असल्याची माहिती त्यांनी ' निवेदक न्यूज 'शी बोलताना दिली.
मराठवाडा वैधानिक विकास मंडळसह राज्यातील इतर विकास मंडळाची मुदत 30 एप्रिल 2020 रोजी संपुष्टात आलेली आहे. घटनेच्या 371(2) कलमान्वये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार व महाराष्ट्र शासनाच्या शिफारसीने अस्तित्वात आलेली विकास मंडळे मुदत संपल्याने विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी हतप्रभ ठरली आहेत. वास्तविक पाहता मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी ही मंडळे गेली अनेक वर्षे मोलाचे काम करत आहेत. मराठवाड्या सारख्या मागासलेल्या विभागात सिंचन, उद्योग, शेती, रस्ते, जीवनावश्यक आरोग्य विषयक सोयी सुविधा इत्यादी बाबतीत प्रचंड भौतिक व आर्थिक अनुशेष निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मंडळाची उपयुक्तता मोलाची आहे. सध्या देशभरासह राज्यात टाळेबंदी सुरू आहे. यात अनेक आवश्यक विकास कामना खीळ बसली असून विकास कामे प्रभावित झाली आहेत. या परिस्थितीत मंडळांना मुदतवाढ देणे अत्यंत गरजेचे असल्याचे विस्तृत विवेचन आमदार भीमराव केरामांनी महामहीम राज्यपाल यांना पाठविलेल्या निवेदनात केले आहे. मराठवाडा वैधानिक विकास मंडळासह इतर विकास मंडळाची राज्यात कशी उपयुक्तता आहे हे अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी संचारबंदी शिथिल झाल्यानंतर थेट राजभवन गाठणार असल्याची माहिती आमदार भीमराव केरामांनी ' निवेदक न्यूज 'शी बोलतांना दिली.




No comments:
Post a Comment