प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीरांचे योगदान...लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम !तारिख १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत दररोज एका कलावंतांच्या योगदानाची माहिती देण्यात येत आहे. - संपादक
तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, राष्ट्रपिता जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव कवी, गायक व शाहीर यांच्यावर असल्यामुळे त्यांच्या कल्पक बुद्धीतून हजारो गीतं निर्माण झाली. समाजाला प्रबुद्ध बनवण्यासाठी, जागृती करण्यासाठी प्रबोधन चळवळीने या गीतांचा वापर केला. समाजातील अंधश्रद्धा नाहीसी करण्यासाठी, अज्ञानरुपी अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी व अर्थपुर्ण जीवन जगण्यासाठी, सकारात्मक दृष्टिकोन व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी महापुरुषांच्या विचारांची निकड समजून प्रबोधन करण्याचे काम प्रत्यक्ष समाजामध्ये जावुन कवी, गीतकार, गायक, शाहीर, जलसेकार, कीर्तनकार व कलापथकातील कलावंत यांनी केले. यातील आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कवी, गायक, गीतकार, व जलसाकार यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. भीमराव कर्डक, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राजानंद गडपायले, शाहीर दलितानंद, शाहीर नागोराव पाटणकर, लक्ष्मण राजगुरु, दिनबंधु शाहीर आत्माराम साळवे, विठ्ठल उमप, शाहीर साबळे अशा कितीतरी कवी, गीतकार व शाहीरांनी आपल्या लेखणी झिजविल्या. प्रबोधनाचे साधन म्हणुन त्यांच्या रचना गायक कलावंतांनी समाज प्रबोधनासाठी खेडोपाडी गायल्या. लोकांना जागृत केले.
किनवट तालुक्यातील घोटी येथील असाच एक शाहीर काशीनाथ गंगाराम भवरे. यांचा जन्म १५ मे१९५६ ला झाला. शिक्षण जेमतेम सहावी पर्यंत. आजोबा रामाबुवा महाराज कीर्तन करायचे. वडील भजनं म्हणायचे. दिंडीमध्ये गायाचे.
गायन कलेचा वारसा वडील गंगाराम भवरे यांच्याकडून मिळाला. लहानपणीच त्यांनी हार्मोनियम वाजवायला शिकविले. भात्यावर हा तही पुरत नव्हता. नंतर गाणं गायला सुरुवात केली.
परिसरात अनेक ठिकाणी कार्यक्रम
किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास ५०० कार्यक्रम व आंध्रप्रदेशात आताच्या तेलंगाणात जवळपास २०० कार्यक्रम झाले. जेतवन बुद्धविहार, सिद्धार्थनगर किनवट व परिसरातील अंबाडी, भुलजा, नागढव, जावरला, सिंदगी, मोहपुर, कुपटी, वंजारवाडी, नागझरी, गोकुंदा, हदगाव, बनचिंचोली, उमरी, भोकर, नागापुर, हिमायतनगर- सिरंजणी, टेंभी, इस्लापुर, सावरी, माहुर तसेच विदर्भात- घाटंजी, सदोबा सावळी, खडका इ. ठिकाणी त्यांचे गाण्यांचे कार्यक्रम झाले. नामदेव कावळे, सोमा मुनेश्वर, शंकर कांबळे हे तबला, ढोलकी साथ करायचे. त्यांची पत्नी शांताबाई यांनाही वाटायचं की त्यांचे पती एका चांगल्या कामासाठी समाजाच्या प्रबोधनासाठीच बाहेर गावी जातात तेंव्हा त्यांचीही काही आडकाठी नसायची.
प्रबोधनाचे कार्य करीत असतांना अनेक नामवंत कवी, गायक यांचा सहवास लाभला. नांदेडला प्रा.रविचंद्र हडसनकर गीतकार यांच्या घरी लोककवी वामनदादा कर्डक यांची सेवा घडली. तसेच कवी गायक विष्णु शिंदे, दत्ता शिंदे, सूर्यकांत भगत, चंद्रकला गायकवाड यांना प्रत्यक्ष भेटता आले.
मनपसंत गीतं-
१) भारतीय घटनेचे एक एक पान,हेच संविधान आहे हेच संविधान.
२)स्वप्नाचाअर्थ एका ओळीत होता, सुमेधबोधी जन्म घेण्या तयारीत होता.
३)कोण माऊली झाडाखाली, ताट घेऊन आली|
गौतमा भुक असी लागली||
४) शिक्षणाच्या मुळेच दिधला,जीवना आकार|
भीमा थोर तुझे उपकार||
५)माझ्या शेतकऱ्यांनं कष्ट लय केलं रं|
एका पावसानं पीक सारं नेलं रं|
६)पोवाडा :धन्य धन्य रामजीच्या सुता,नमीतो माथा,क्रांतीकारी नेता,घटनेचा दाता,लिहुणनि या गाथा|
देशभक्ती किती तुझे उपकार, शब्दरूपी फुलांचे हार
शाहीराची ऐकावी ललकार
या सोबतच डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारीत गीते लिहिली १९९५ ते २००० या साली ती गायली. उल्लेखनिय -महागावचे शासनक्रांती भंते यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला त्यात 'लगीन झाल्यावर मायबाप सोडुन पोरगं वेगळं झालय रं| या गीतांवर रसिक अक्षरशः हळहळले, गहीवरुन रडले .
या व्यतिरिक्त शासकीय कार्यक्रम-साक्षरता अभियान, लेक शिकवा अभियान,पाणलोट क्षेत्र व आरोग्य विषयक जनजागृती केली. सोबत शासन प्रतिनिधी उत्तम कानिंदे व त्यांचे दहा सहकारी होते. त्यांना शासनाचे प्रशस्ती पत्र व स्मृतीचिन्ह देऊन तत्कालिन जिल्हाधिकारी सुधीरकुमार गोयल यांचे हस्ते गौरविण्यात आले. तसेच संत कबीर समता परिषदेचा किनवटरत्न व नांदेडरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे.
संदेश- समाज बांधवांना ते सांगतात की माता रमाईने खूप कष्ट सोसले म्हणुन बाबासाहेब आंबेडकर घडले. बाबासाहेबानी आपणास धम्म दिला म्हणुन आपणास सन्मान मिळाला.त्या धम्म तत्वाने चाला्वे, संविधान महत्त्व पटवावं,आजच्या स्त्रीयांनी रमाईचा आदर्श घ्यावा.
प्रकाशित गीतसंग्रह-
पंचशील गीतमाला भाग१-१६गाणी.
पंचशील गीतमाला भाग२-५५गाणी.
पंचशील गीतमाला भाग३-१०१गाणी प्रकाशनाच्या वाटेवर.
शाहीर काशिनाथ भवरे यांच्या या निरंतर प्रबोधन कार्यासाठी त्यांना दिर्घायुष्य लाभो ही मंगल कामना करुन शुभेच्छा देतो.धन्यवाद . !
-आयु. महेंद्र नरवाडे,
किनवट, नांदेड
(मो.न.९४२१७६८६५०)
माझ्या बाबांच्या कार्याची दखल घेऊन प्रसिद्धी दिल्याबद्दल निवेदक न्यूज, महेंद्र नरवाडे सर आणि संपादकाचे मनःपूर्वक आभार सर!
ReplyDelete🙏🏻👏🏻🌹👍🏻✍🏻😊