किनवट : रविवारी ( ता. 30 ) दुपारी 2.40 वाजता किनवट ते तेलंगाणा मार्गावर पाटोदा (खुर्द) शिवारात दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात घटनास्थळीच दोघे ठार झाले असून गंभीर चौघा जखमींना संदर्भ सेवेसाठी नेत असतांना दोघेजण वाटेतच गतप्राण झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इस्लामपूरा, किनवट येथील गौस अकबर शेख ( वय 39 वर्षे ) दुचाकीवर समोर मुलगा शेख साहिल शेख गौस (वय 6 वर्षे ), मागे मेव्हुना शेख कलीम ( 30 वर्षे ) व पत्नी हसीनाबी ( वय 26 वर्षे ) यांना बसवून किनवटवरून चिखली मार्गे तेलंगणात जात होते. ते किनवट वरून अंदाजे 19 किमी अंतरावर पाटोदा (खुर्द) शिवारातून प्रवास करू लागले. त्याचवेळी मलकापूर-खेरडा येथील रहिवाशी अंकुश दत्तराम जाधव (वय 31 वर्षे ) व गणेश चव्हाण (वय 30 वर्षे ) हे दोघे तेलंगाणातून किनवटकडे येत होते . त्याचवेळी रविवारी (ता. 30 ) दुपारी 2.40 वाजता दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोराची धडक झाली. घटनास्थळीच गौस अकबर शेख (वय 39 ) व अंकुश जाधव (वय 31) यांचे निधन झाले . तर उर्वरीत चौघा जखमींना उपजिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे आणले असता त्यांची अवस्था पाहून पुढील संदर्भिय सेवा उपचारासाठी आदिलाबादला पाठविले. रस्त्यातच शेख कलीम (वय 30 वर्षे ) व शेख साहील शेख गौस ( वय 6 वर्षे ) यांचे निधन झाल्याचे समजते. हसीना बी ( वय 26 वर्षे ) व गणेश चव्हाण (वय 30 वर्षे ) हे गंभीर जखमी आदिलाबाद ( तेलंगाणा ) येथे उपचारार्थ दाखल आहेत.
पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार कांबळे, जमादार बाळासाहेब पांढरे व होमगार्ड सय्यद फेरोज अली अधिक तपास करीत आहेत.






No comments:
Post a Comment