मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : शालेय शिक्षण विभागामार्फत सन 2022-23 च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे मंगळवार दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी शिक्षक दिनी वितरण करण्यात येणार आहे. हा समारंभ दि. 5 सप्टेंबर, 2023 रोजी दुपारी 4 वाजता टाटा थिएटर, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स (एनसीपीए), नरीमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, राहुल शेवाळे, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे आदी उपस्थित राहतील.
समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यामध्ये प्राथमिक प्रवर्गात 37, माध्यमिक प्रवर्गात 39, आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) 19, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार आठ, विशेष शिक्षक कला/ क्रीडा दोन, दिव्यांग शिक्षक / दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक एक आणि स्काऊट – गाइड साठी दोन असे एकूण 108 पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार करण्यात येणार आहे.
सदर राज्य पुरस्कृत शिक्षकांना एक लाख दहा हजार रुपये रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
आदिवासी भागातून सुरेंद्र कुडे यांचा समावेश
नांदेड जिल्ह्यातील असणाऱ्या माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेडी (पालाईगुडा) येथे कर्तव्यावर असलेले सुरेंद्र गंगाधर कुडे हे प्राथमिक शिक्षक म्हणून चाकोरीच्या बाहेर जाऊन समाजासाठी समर्पकपणे काम करतात. हे आशादायी चित्र आहे. रविवारची सुटी असो किंवा सण व उत्सव असो त्या सुटीचा उपभोग न घेता ते सकाळी 8 ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शाळेत हजर राहून विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देतात. या त्यांच्या प्रभावी नवोपक्रमामुळेच तब्बल 28 विद्यार्थ्यांना त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिलाय, 200 पेक्षाही जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेत व 80 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेत.
आदिवासी, डोंगरी व अतिदुर्गम भागात उत्कृष्ट कार्य केल्याच्या गौरवार्थ त्यांची राज्य शासनाच्या यावर्षीच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुण गौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.




No comments:
Post a Comment